Monday, February 25, 2019

#प्रपोज

हा त्यां दोघांचा ऑलमोस्ट 13 वा व्हॅलेंनटाईन होता. आज तो ऑफिसला नेहमीपेक्षा लवकर जाणार होता आणि लवकर येणार होता , कारण त्यांच्या मित्रमंडळात आज एकत्र सेलिब्रेट करायचे ठरले होते. मुलांसाठीचे खाणे ,खेळणी ,पुस्तके अशी तयारी करून ती आधी पोहोचणार होती . मोठा मुलगा छोटूला छान सांभाळत असल्याने ,त्यांना फार काळजी नसायची. एकाला दोघे असले की आईवडील थोडे निर्धास्त होऊ शकतात नाही का !
         तसं तर त्यांचं लव्ह मरेज.  लग्नाआधीचे दिवस जितके छान , तरंगत गेले , लग्नानंतर मात्र गालबोट लागल्यासारखे झाले. असूया , मत्सर, किंवा स्त्रीसुलभ हेवा तिच्यात मुळीच नव्हता. दागिने ,कपडे ,पैसे, घर यातही अडकणारी नव्हती ती त्याच्या आई-बाबांचं  मात्र 'मी' आणि 'माझं' कधी सुटलं नाही. 'My home my rules' हा फंडा. टाळी एका हाताने वाजत नाही हे बरोबर, पण समोरचा तुमच्या चार गोष्टी समजून घेतोय म्हणल्यावर तुमचीही तसं करण्याची जबाबदारी बनते ना, सारखंच समोरच्यावर बोट ठेवायचे तर घर शांत राहील का? कुठलेही छंद , मित्र- मैत्रीण नसणं ही गोष्ट स्वभावात अनेक निगेटिव्ह बदल करते , जणू स्लो पॉयझनिंग. म्हणजे समारंभात एखादं टोळकं सतत टीकेच्या सुरात असत ना ,टीकेचं लक्ष्यही absolutely बिनडोक ... म्हणजे केस किती लांब आहेत नई का हिचे ,पण मऊ नाहीत अजिबात ; ती अमकी - ढमकी शिकलेली आहे खूप , नोकरीही भक्कम पगाराची , घरचं करून जाते कामाला ,पण दिसायला काही खास नाही ह् ;  - हे असं जवळचं सगळंच. नकारात्मक बाजूला झुकणारे स्वभाव आणि अडेलतट्टू वृत्ती.
तिने सासरी atjust करण्याचा हरघडी प्रयत्न केला या गोष्टीचा सगळ्यात मोठा साक्षीदार तो स्वतः च होता .
त्याला वाटायचं एखादं भावंड असायला पाहिजे होतं आपल्याला , आई-बाबांचा आपल्यावरचा फोकस विभागला गेला असता ,झालेला त्रास सौम्य झाला असता.
             इथे अमेरिकेत आल्यावर जीवाला थोडी शांतता मिळाली, त्यामुळेच राहून गेलेला दुसरा चान्स त्यांनी  इथे घेतला. ते नऊ महिने आणि डिलिव्हरी खूप अवघड गेली. ती मैत्रिणीत खिदळताना म्हणायचीही ' वर हात लावून परत
आलेय मी'. खरंच होतं. त्याला स्वयंपाक यायचा नाही याची गिल्ट या काळात अनेकदा वाटली त्याला, ते त्याच्या लेखी दुय्यम किंवा नावडीचं काम होत अशातला भाग नव्हे ,पण हे स्किल इतक्या प्रकर्षाने कधी आपल्याला लागेल असं वाटलं नव्हतं त्याला. 'प्रेग्नसी पिरियड आणि डिलीव्हरी क्रिटिकल असेल' ही Dr ची वॊर्निंग डोक्यात सतत असायची.' तिला काही झालं तर ' ची शक्यता त्याची झोप उडवून जायची. मग तो जरुरी पुरता स्वयंपाक शिकला. तिला शक्य तेवढी शारीरिक, मानसिक विश्रांती दिली त्याने. काय केलं म्हणजे तिला बरं वाटेल ? याचा विचार करत असतानाच  'गरजेच्या वेळी तिच्या बाजूने ठामपणे उभं राहणं' हे तिला हवं असणार एकमेव सुख आपण दिलं नाही याची जाणीवही त्याला याच काळात झाली.
            दुसरा लेक दोन वर्षांचा होत आला , आणि ती जराशी सुटी झाली. मुलाची जबाबदारी बरोबरीने घेत ,त्या दोघांनाही किमान गप्पा मारायला थोडा वेळ मिळू लागला. ती सुद्धा तिच्या 'शिकवणे , वाचन, व्यायाम' या त्रिसूत्रीत परत गेली.
           आज प्रेमाचा दिवस. छान रेड कलरचे मॅचिंग कपल ड्रेस घालून चारही जोडपी तयार होती. चक्क आज सगळ्या पतीदेवांनी स्वयंपाकाचा भार उचलून एक एक पदार्थ आणला  होता. खरं तर हेच valentine चं मोठं गिफ्ट होतं. पण खरा रोमॅंटिक टास्क तर पुढे होता. काही कपल्सचं अरेंज मॅरेंज त्यामुळे 'प्रोपोज' करायचं राहूनच गेलं म्हणून लालचुटुक गुलाब आणले होते, आणि प्रत्येकाने बायकोला प्रोपोज करायचं होतं.
           आणि त्याला क्लिक झालं, हीच ती वेळ बोलण्याची ... मोकळं होण्याची . फक्त बायकांच्याच मनात साठतं असं कुठेय. पुरुषांच्याही साठतं की. शब्द जुळवायचीही गरज त्याला पडली नाही. त्याचा टर्न आला... हातात फुल धरून तो तिच्यासमोर गुढग्यावर बसला......
 " आपला हा दुसरा प्रोपोज आहे खरं तर , आधीचाही आठवतो .....किती छान दिवस होते ते.....
मला माहित आहे मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. तुला माझ्या घरात खूप मानसिक त्रास झाला. ज्याच्या भरवशावर लग्न करून या घरात आलो तो माणूस खंबीर पाठीशी उभा असेल तर कोणत्याही परिस्थितीत बायको आनंदाने राहू शकते. हे कळायला उशीर झाला मला. तू बरोबर असूनही तुला त्रास होत असताना ठामपणे तुझी बाजू नाही घेतली मी. I m sorry. यामुळे आयुष्यातला खूप मोठा काळ तुझ्या क्षमतांचा विस्तार तू करू शकली नाहीस. यालाही अप्रत्यक्षपणे मी जबाबदार आहे. पण आता आपल्याला वेळ मिळतोय , मी तुला कायम सुखात ठेवण्याचा प्रयत्न करेन, नवरा - बायकोच्या पलीकडेही आपण आधी जसे एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो, ते विसरूनच गेलो , तसे पुन्हा बनुया. स्वच्छ मन असणारी पार्टनर मला मिळाली ,मी लकी आहे खरंच!
"Will you marry me again ?"
-  "Yes",  डोळ्याच्या कडा पुसत ती म्हणाली.
 डोळ्यासोबत मनावरच्या ओझ्याचाही बोळा निघाला....पाणी वाहतं झालं.

© वीरश्री वैद्य - करंदीकर

(सत्यकथेवर आधारित)

Tuesday, January 8, 2019

नको तेच उद्योग मंडळ

#नको_तेच_उद्योग(मंडळ)
आजी-आजोबा बरेचदा नातवंडांना म्हणतात, "आमची मुलं नव्हती बाबा एवढी व्रात्य" .       असं काही नसतं .
सगळ्यांनी आपापल्या लहानपणी मोठ्यांना वैताग आणलेला असतोच . नाणी गिळणे, नाकात शेंगदाणा घालणे, खोली किंवा बाथरूम मध्ये जाऊन आतून कड्या लावून अडकणे, खिडक्यांच्या काचा फोडणे, कात्रीने स्वतःचे /भावंडांचे केस कापणे, पिठाच्या धान्याच्या रांगोळ्या काढणे, नळ चालू करून सगळा पिंप रिकामा करून घराचा स्विमिंग पूल करून ठेवणे हे आणि असले असंख्य प्रकार प्रत्येकाने केलेलेच असतात.
तरी आगाऊपणाची ठळक उदाहरणे झाली ,बाकी मित्रांच्या टोळीमध्ये परस्परसंमतीने बिनबोभाट उरकलेले उद्योग हा तर स्वतंत्र पोस्ट चा विषय होईल.😆😆
          मुलाचे लहानपण ते नातवंडं येणं यात किमान 25 वर्षांचा काळ मध्ये उलटून गेलेला असतो ,त्यामुळे मुलांनी लहानपणाचे बरेच असे वैताग आणलेल्याचा विसर आजी आजोबाना पडलेला असतो. दुसरं असं की मुलांचे शिक्षण , त्यांनी मिळवलेली बक्षिसे, त्यांची करिअर development असे खूप आनंदाचे आणि कौतुकाचे प्रसंग एव्हाना त्यांच्या डोक्यात घर करून असतात.
          ज्या घरात लहान मूल असतं ,त्या घरातल्या वस्तूंची रचना त्या प्रकारात असते ,म्हणजे सगळ्या वस्तू almost तीन फुटांच्या वर असतात. सैल झाकणाचे डबे वरच्या शेल्फ मध्ये असतात . विळी / चाकु/ स्क्रू ड्राइव्हर अशा टोकेरी ( इजा होऊ शकणाऱ्या ) वस्तू कट्ट्यावर ,खिडकीत अशा उंच ठिकाणी जातात. हॉल मधले टोकेरी कोपऱ्यांचे टेबल वा तसे फर्निचर नसते किंवा असलेच तर त्याच्या कडा रबरी कॉर्नर ने कव्हर केल्या जातात , पाण्याची भांडी मुलांच्या हाताला येणार नाहीत अशी वर ठेवली जातात.... वगैरे वगैरे . मुलांनंतर पुढे नातवंडे येईपर्यंत पुढल्या खूप वर्षात वरचेवर येऊन घरात वावरणारे हक्काचे लहान मूल नसते, त्यामुळे मोठ्यांच्या सोईनुसार घरातल्या वस्तूंच्या जागा सेट झालेल्या असतात . जसे की देवघर खाली येते , पिण्याच्या पाण्याचे हांडे ,कळश्या ज्या कट्ट्यावर चौकोनी बेसिन शेजारी असायच्या त्या खाली भरून ठेवलेल्या असतात. हे अस्स सगळं घर म्हणजे नातवंडांची प्रयोगशाळाच. मग काय होतात कुटिरोद्योग सुरू....
          मुलाच्या खोड्या निस्तरताना तरुण असलेले आजी -आजोबा नातवंडपर्यंत मात्र थकलेले असतात, त्यामुळे साहजिकच इतक्या वर्षांनी लहानग्यांनी घरभर सुरू केलेले प्रयोग त्यांना वरचा डायलॉग म्हणायला भाग पाडतात😂.
© वीरश्री वैद्य - करंदीकर

Saturday, December 8, 2018

#दाढी
ज्या आयांना दोन मुलंच ,त्यांचे काय वांदे होत असतील. म्हणजे चौघांचं कुटुंब म्हणलं तर घरात 3 पुरुष , एक मोठ्ठा ,दोन छोटे छोटे . साधे सेप्टिपिन शेअर करायला पण चान्स नाही. मुलीला जितक्या सहज ती मागता किंवा शोधून दे म्हणून सांगता येते तसे यांना कसे सांगणार?तुम्ही म्हणाल सेफ्टीपिन काय ? हे उदाहरण आहे ( तसंही एक सेफ्टीपींन की किंमत तुम क्या जानो बाबू😢)काहीची मुलं देतीलही शोधून एखादयावेळी, पण नंतर भाडीपा मधल्या अनी सारखे 'क्काय? पिन?' असा डायलॉग येईल.
एरवीही आई काय म्हणतेय याकडे मुलांचं लक्ष नसतंच, ' हीची सारखीच काहीतरी बडबड चालू असते, काय लक्ष द्यायचं?  अस्सा ऍटिट्युड असतो (बापसासारखा). असं नसेल एखाद्या घरी , तर मुलं जादूच्या दिव्यातल्या राक्षसासारखी असतातच सारखं 'काय करू?', 'काहितरी नवीन दे'  किंवा 'शोध'.
               यापेक्षाही भयावह म्हणजे 'माझं हे कुठाय? ,माझं ते कुठाय? असे प्रश्न विचारणारे तीन-तीन जण ??? ( इथं एक झेपेना ).
            दुसऱ्या खोलीत असलेल्या आई ला बोलवताना आपण "आई तू काय करतेयस?" अशी सुरुवात करतो .
माझ्या ओळखीच्या एक काकू आहेत त्यांना असे विचारले की त्या म्हणायच्या 'दाढी करतेय'. फार हसायला यायचं ऐकून, गंमत म्हणजे त्यांनाही दोन मुलंच
           आता हे सगळं डोक्यात येण्याचं कारण म्हणजे ,  स्वयंपाकघरातली आईची सुरी घ्यायला सर्कस सुरू झाली होती म्हणून सव्य ला प्लास्टिक सूरी ,काटे चमचे सेट आणून दिला मध्यंतरी. त्यातली एक सूरी घेऊन साहेब मला म्हणतात , "आई , दाढी कर, दाढी." मी म्हणाले मला नाही येत , मला म्हणायचे होते मला उगवत नाही ,तर त्याला वाटले की 'करता येत नाही, म्हणाला "मी करतो तुझी दाढी". हे ऐकून दुसऱ्या सेकंदाला मला त्या दाढीवाल्या...म्हणजे..' दाढी करतेय'
म्हणणाऱ्या काकू आठवल्या आणि त्यांचं दुःख मी समजून घेऊ शकले, त्याच्याच पुढच्या सेकंदाला दोन मुलं असलेल्या सगळ्या मैत्रिणी डोळ्यासमोर आल्या , त्यांची मुलं त्याच्या दोन्ही बाजूला बसून दोन्ही गालाची दाढी करत होती. 😂😂😂😂😂😂😂
© वीरश्री वैद्य - करंदीकर

Wednesday, November 14, 2018

अपेक्षांची दुसरी बाजू

बाळ असल्यापासून  आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो ... आपल्याही नकळत...  हेच की  रात्री जास्त वेळा उठू नये, जास्त रडू नये,  नीट पोटभर (त्यांचं का आपलं याबाबत गोंधळ ) खावं,  अंघोळ नीट करून घ्यावी वगैरे.....
             शाळेत गेल्यावर स्मार्ट असावं, तो अमका ढमका कसा बोलतो तसंच व्यक्त व्हावं, उगाच त्रास देऊ नये कोणाला , पण स्वतःचही सहज देऊ नये दुसऱ्याला, थोडक्यात डिफेनसिव्ह पण असावं वगैरे ,वगैरे ....

     अतिशयोक्ती नाही पण मरेपर्यंत काही ही लिस्ट संपत नाही...
तसे पाहता त्यांचा जन्म हा आपला निर्णय असतो, ते काही उपकार वगैरे नसतात.....त्यांनीही ते मानू नये....
       
         याची दुसरी बाजू मात्र फार कमी लोक विचारात घेतात किंवा त्यावर काही अंमलबजावणी करतात....
स्वतंत्र अस्तित्व म्हणून त्यांच्याही अपेक्षा असतातच की...पालकांकडून....
जास्त नाही ,छोट्या छोट्या (त्यांचं वयआहे तेवढ्याच छोट्याश्या),     वेळ देऊन खेळणे.... हाक मारल्यावर बघणे ..ओ देणे.. काय म्हणतोय ते ऐकून घेणे....
        पुढे शाळेत गेल्यावर सोडायला येणाऱ्या पालकांकडे बघून तसे तसे स्मार्ट वागणे ... इंग्लिश - विंग्लिश मुव्हीमध्ये थोडी झलक दाखवली आहे याची...
कालपरत्वे स्वतःच्या वागण्यात, पेहेरवात, स्वभावात बदल करणे....
म्हातारपणी किमान थोडाफार व्यायाम , फिरून  स्वतःला फिट ठेवणे , अंगावर दुखणी न काढणे, वेळच्या वेळी चेकअप करून घेणे वगैरे वगैरे ...
       पालक झालो की दुसरी बाजू विसरायला होते बहुतेक (यात मीही आलेच ) . बालदिन निमित्ताने  पालक म्हणून आत्मपरीक्षण आणि भविष्यविचार करताना जे मनात आले ते मांडले . अर्थात मीच मांडलेली ' दुसरी बाजू ' यावर विचार तर आहेच पण ते अमलात आणायला आजपासून सुरुवात करेन हे मात्र ठरलं!

©वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, August 7, 2018

युरेका

#युरेका
आज पुन्हा तेच झालं, त्याची शिकवताना चिडचिड आणि त्यानंतर तिचा अजूनच उडालेला गोंधळ. गेले महिनाभर तो तिला गाडी शिकवत होता, आणि त्याच्या म्हणण्यानुसार अजूनही ती खूप चुका करत होती.
झालं असं की इथे ड्रायव्हिंग क्लास लावणं परवडणारं नव्हतं, पण वाहतुकीचे नियम काटेकोर पाळले जायचे त्यामुळे चालवणं सोपं होतं. तो सुद्धा त्याच्या मित्राकडूनच गाडी शिकला होता. थोडी चूक सुद्धा महागात पडायची. लायसन्स वर पॉईंट चढणार , दंड तर भरवाच लागणार , गाडीचा आकार तर बिघडणारच , तो सरळ करायला खिशाला पुन्हा बांबू लागणार अशा भित्या आणि टेन्शन त्याला  असायचं आणि तो काही प्रोफेशनल ड्राइविंग टीचर वगैरे नव्हता.
हे सगळं तिला माहीत होतं , समजतही होतं, पण चिडल्यावरचे त्याचे वेंधळी , बावळट आणखी काही नवे नवे शब्द निघायचे ते तिला फार टोचायचे. नंतर त्यालाही वाटायचं ओव्हररिऍक्ट झालो आपण....पण एक चूक आणि पुढचे सोपस्कार त्याच्या टेन्शनने तो त्या वेळेत फाsर पॅनिक व्हायचा.
दुसऱ्या बाजूला ती मनाशी ठरवायची की त्याला बोलायची एकही संधी द्यायची नाही, इतकं व्यवस्थित चालवून दाखवायचं , पण ती काल जशी चुकली तशी सिच्युएशन आली की तो रागावूनच सांगायचा आणि मिठाचा खडा पडायचा, ती गोंधळायची, आणखी चुकांची भर पडायची.
           संध्याकाळच्या या ड्रायव्हिंगच्या तासाभराचे सावट आताशा तिच्या संपूर्ण दिवसावर पडायला लागले होते , स्वयंपाकातही कधी नव्हे तो गोंधळ होऊ लागलेला.
तिने ठरवलं...
'नकोच ते ...मला नाही शिकायचं ..सांगायचं आज त्याला. या विचारानेच तिला बरं वाटायला लागलं.
 ''रोज वेंधळी म्हणतो मला , इतकीच वेंधळी असते तर तुला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी जागेवर मिळतात, ते का उगीच ? एखादा पदार्थ खावसा वाटला तर त्याचं सगळं साहित्य घरात नेहमीच असतं, कुणाला जेवायला बोलावलं तर कमी पडत नाही आणि उरतही नाही, इतकी अचूक जजमेंट असतात माझी."
या स्वगताची तार अचानक व तुटली ती तिच्याच आतून आलेल्या प्रश्नाने ,
' मग गाडी चालवताना हे जजमेंट कुठं जातं बरं?'
-' हो ना, खरंच की ! म्हणजे आपण काही वेंधळ्या नाही! आपल्याकडे चांगली जजमेंट पॉवर आहे!'
तिने याच्या मुळाशी जायचे ठरवले . कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये शिकली होती ना ती तसे रूट कॉज काढायचे...
'तो शेजारी बसून आत्ता ओरडणार , मग रागवणार अशा शक्यता गृहीतच धरून बसतो, त्यामुळे आपण
चुका करतो का काय?
 का असं आहे की , तो बसल्यामुळे चला काहीही झाले तरी तो आहे अशा कम्फर्ट झोन मध्ये आपण नकळत जातोय? जबाबदारी नकळत त्याला देतोय?
मग जर तो शेजारी नसेल तर?
हो हे ट्राय केलं पाहिजे , तरंच कळेल आपलं ड्रायव्हिंग जजमेंट".
विचार शेवटाला पोहोचला तोपर्यंत तीने गाडीची चावी हातात घेतलेली. रविवार असल्याने तो क्रिकेट खेळायला गेला होता , दोन तास तरी येणार नव्हता.
             एकटी गाडी चालवायची पहिलीच वेळ ... तिने बेल्ट लावला...चावीने गाडी स्टार्ट केली... पार्किंग मधून बाहेर काढली ..... स्टॉप साइन, राईट लेन चे नियम पाळत सोसायटी मधून बाहेर काढली... कोपऱ्यावरच्या मॉलला मागे टाकून नेहमी तिला अवघड वाटणारा राईट टर्न लीलया घेतला ....पुढे येणारा प्रत्येक टर्न तिचा आत्मविश्वास वाढवत गेला ....एक मोठा गोल फिरून ती घरी परत आली.कधी नव्हे ते दोन गाड्याच्या बरोबर मध्ये आज तिने गाडी पार्क केली.
स्वतःशी हसत हसत तिने घराचे दार उघडले.
आज तिचं काहीही बिघडणार नव्हतं , ना फूड , ना मूड.

©वीरश्री वैद्य - करंदीकर

Thursday, April 19, 2018

व्यथा

         आतापर्यंत स्वतः ची काळजी न घेता , कष्ट केलेल्या आई - वडिलांना चांगले, निरोगी,आयुष्य,जास्त जगता यावे अशी कित्येक मुलांची निर्मळ इच्छा असते. लवकर परावलंबी व्हायला जसे आई-वडिलांना आवडत नाही तसे मुलांनाही आपल्या आई वडिलांना झालेलं बघणे आवडत नसतेच.
          स्वतः मिळवलेले किमान आरोग्यासाठीतरी स्वतः वर खर्च करायला जमत नाही , पण मुलं खर्च करायला वेळ द्यायला तयार असतील तरीही नाटच असतो.मुलं set होईपर्यंत काम आणि काटकसर केलेलीच असते, पण स्वतःची उतरवयातल्या शरीराची काळजी घ्या म्हटलं
'काय करायचंय??'कशाला ?असले प्रश्न.
        आई-बाबांचे धरणारे गुढगे, सतत दुखणारी कंबर, झिजणारे मणके बघणं सोपं नसतं हो....
कुठल्याही सणवारात उसनं अवसान आणून हे काम करतात.' आत्ता करतील आणि नंतर पडतील आडवे ' हे वाक्य यांना सुखावत असलं तरी मुलं काही ते आनंदाने बोलत नसतात.
        याउलट एखादे दिवशी आपण आजारी असताना औषधांचा एखादा डोस घ्यायची नुसती टाळाटाळ करून बघा , इतकी भुणभुण लावतील कानाशी की बाssssस . आपण म्हणालो की तुम्ही तरी कुठे नीट काळजी घेता स्वतः ची, मग आम्ही का घेऊ ? तर लगेच हल्लीची मुलं , ऐकत नाहीत.... आमच्या वेळेला ........ असं सुरू होईल सगळं ........
पण आम्ही पण घेऊ काळजी तुम्ही म्हणता तशी असं काही म्हणत नाहीत.
    मुलाच्या वागण्याला लहानपणी जसे आई-वडिलांना जबाबदार धरतात , तसेच म्हातारपणी त्यांना काही झाले तर मुलांनाच जबाबदार धरतो समाज आणि मुलांना वाट्टेल ते ऐकवतो, बोलतो.एरवी लोकांच्या बोलण्याची यांना पडलेली असते. मुलांविषयी हे असं कुणी (त्यांची चूक नसताना )बोललेलं किंवा कानावर आलेलं चालतं का?
     दुखण्याचा बाऊ करू नये हे बरोबर पण त्याकडे अशक्य दुर्लक्षही नको.
     म्हातारपण हे दुसरं बालपण म्हणतात. न ऐकलं लहान मुलांना दोन धपाटे देता येतात. यांचं काय करायचं?
        जे ज्येष्ठ स्वतः ची काळजी घेऊन निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात त्यां सगळ्यांना माझा इथूनच कौतुकास्पद नमस्कार ..

© वीरश्री वैद्य - करंदीकर

Wednesday, April 11, 2018

बाकी काहीही दुखू दे , दात नको..दातदुखीचा धसका 99%लोकांना असतोच. त्यात नेमके हे दात रात्री ठणकायला सुरुवात करतात . लवंग , पैन किलर , कश्श्या कश्श्याचा म्हणून उपयोग होत नाही , तो ठणकत राहतोच, झोप कशीबशी लागली तरी दिवसा खायचे वांदे होतात ते वेगळेच. इतक्या खत्रुड वेदना सहन करूनही बरेचजण डेंटिस्टची पायरी काही चढत नाहीत. कारण एकच 'भीती'.
       हे फक्त दाताच्या बाबतीत नाही तर कान आणि नाक   या बाबतीतही असतेच, कारण या आपल्या अत्यंत खाजगी जागा आहेत. याला दुसऱ्या कुणाचा हात लावू देणं हे मेंदूलाही चटकन मान्य होणारं नसतं, मेंदू शरीराला defencive मोड मध्ये जायची आज्ञा देतो. पण treatment च्या वेळेला हे आपल्या भल्याचं आहे हे मनाला ठाऊक असतं, त्यामुळे मन आणि मेंदूची आज्ञा याचं कॉम्बिनेशन तयार होतं , ते म्हणजे प्रचंड भीती.
त्यातून भरीस भर म्हणून डेंटिस्टचं त्याच्या छिन्नी-हातोड्याचं सुसज्ज केबिन. त्याच्यासमोर आssss करून बसल्यावर तो त्याच्या अस्तन्या सरसावून तीन चार कसले कसले tools तोंडात घालायला लागतो.
इतर अनेक सुररर , फुररर , सुईईइ , पीपीपी असा आवाज करणाऱ्या अनेक यंत्रांनी ही भीती आणखी गडद होत जाते.... की बरेचजण अगदी आणीबाणीची वेळ आल्याशिवाय ( लोकांचे दात कोरून पोट भरणाऱ्या, बिच्चाऱ्या ) dentist कडे जात नाहीत.
       ही पोस्ट एवढ्या confidently लिहिण्याचे कारण मला भीती वाटत नाही ( इतकं दातांच काम झालंय ).
त्यामुळे आता मी भिणाऱ्यांवर दात काढून हसते.
#आपले_दात_आपलीच_पोस्ट

©वीरश्री वैद्य - करंदीकर