Friday, November 10, 2017

PRO

#_P_R_O
घरातील सगळीच माणसे मनमिळावू आहेत अशी कुटुंबे फार कमी . उरलेल्या बाकी घरातील लोकांमध्ये कोणी एक व्यक्ती  PRO( public relation officer ) असते.....
 नातेवाईक, शेजारी-पाजारी, त्यातुन निर्माण झालेल्या ओळखी, ह्या सगळ्या लोकांना आपल्या घराशी ही व्यक्ती जोडून ठेवतो. हा PRO चा बिनपगारी job सोपा नाही.
विरुद्ध स्वभावाच्या माणसांना हँडल करणे ,
अहंकारी लोकांची मने सांभाळणे, 
एखाद्या सण समारंभात एकमेकांशी न पटणाऱ्या दोन व्यक्तींची मर्जी राखणे,
 सतत कटकट करणाऱ्याला एखाद्याला समंजसपणे सामावून घेणे,
जे काही थोडेफार शहाणे , समजूतदार असतात त्यांनाही कायम गृहीत न धरता ,त्यांचे कोड पुरवणे ,
वयस्कर लोकांच्या तब्येतीची आवर्जून चौकशी करणे.....वगैरे वगैरे
अशा अनेक कसरती त्यांना दरवेळी कराव्या लागतात.
            काही फेक PRO पण असतात , कोणाचं काय चाललंय हे कळावं (म्हणजे गॉसिप ला विषय मिळतो)किंवा (तो आमकां/ढमका मुळीच करत नाही पण )आम्ही सगळ्यांचे सगळे कसे करतो याचे मानसिक समाधान त्यांना मिळवायचे असते.
           तारेवरची कसरत सांभाळून आपले कुटुंब इतर माणसांशी, समाजाशी जोडून ठेवणार्या ओरिजनल PRO ना
Hat's off ....👌

© वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, November 6, 2017

हनुमॅन

#_हनुमॅन
            भीती वाटली किंवा कोणतीही ताकदीची सीमा म्हंटली की आठवायचा तो मारुतीराया. लहानपणीचा सगळ्यात आवडता आणि जवळचा वाटणारा देव.
आजोबांनी गोष्टी सांगताना हनुमान त्याच्या वेगवेगळ्या पैलुंसकट इतका सुंदर उभा केला होता की बाकी कुठलेही सुपरहिरो मला तितकेसे कधी आवडले नाहीत. मुळात त्यांच्यात आणि इतर सुपरहिरो मध्ये मुख्य फरक हा की,   भीती वाटल्यावर किंवा संकटांच्या वेळी सुपरमॅन नाही आठवत किंवा आठवून बघितला तरी धीर नाही येत, पण कधी एकदा सुद्धा म्हणलेले मारुतीस्तोत्र किंवा त्याची एखादी गोष्ट आठवून बघा आलेल्या अडचणींचा सामना करण्याची ताकद नककी येईल.
          पुढे संदीप खरे च ' सुपरमॅन' गाणं ऐकल्यावर वाटलं की हे गाणं लहान मुलांसाठी नाहीच . या गाण्यात सुपरमॅन खूप ताकदवान, सगळ्यांना मदत करतो, अडचणींना धावून जातो, सगळ्यांचा फेव्होरेट...  पण आतून का कोण जाणे त्याला एकट वाटतं , उदासपणा येतो.   अशा एकटेपणातच एका उंच शिखरावर गेला असता त्याला हनुमान भेटतो ....
त्याला कर्मयोग सांगतो, आत्मभान देतो.
           कासव' film ची समीक्षा वाचल्यावर तर हे गाणं आणि मारुतीराया पुन्हा प्रकर्षाने आठवला. 
        वालीच्या सैन्याचा सेनापती 'केसरी' चा तो मुलगा , जन्मतानाच चांदीचा चमचा जणू तोंडात घेऊन आलेला....
वडिलांनी बेस सेट केलेला .... उत्तम शिक्षण देऊ केलेला , भाषा /व्याकरण यात पारंगत ..व्यायामाने , तंत्रशुद्ध बाहुबल आत्मसात केलेला .....
अगदी आताच्या पिढीसारखा, ज्यांना आधीच पायघड्या घालून ठेवल्यात (बेस सेट आहे असा)
पण....
अतुल बुद्धी आणि अचाट शक्ती आपल्या राम भक्तीने (आपण आत्मभानाने म्हणूया ) संयमित केली त्याने ....
त्यामुळे त्याला कधी frustration आलें नाही....
एकटेपणा / पोकळी असले काहीही जाणवले नाही...
आपल्या हातून योग्य कार्य राम करवून घेतो, आपण निमित्त मात्र... याच भावनेने कार्य केल्यानें संकटमोचन झाला...
       मुलांना येणारे ताण,तणाव यावर उपाय लहानपणापासूनच आपल्या या देशी सुपरहिरो ची नीट ओळख करून द्यायला हवी, पालकांनीच तो आधी नीट समजून घ्यायला हवा.
मारुतीस्तोत्र, त्याचा अर्थ..याने त्यांना धीर तर मिळेलच पण आताच्या तरुण पिढीला येणारे frustration, निराश यावरही नक्कीच हा 'रामबाण' उपाय ठरेल असे मला एक पालक म्हणून वाटते . 
     आफळे बुवांच्या कीर्तनात त्यांनी कुठल्याही चमत्काराशिवाय , माणूस म्हणून हनुमान ( अगदी लॉजिकली ) मांडलाय. प्रत्येक पालकाने ऐकावे असे हे किर्तन, त्याची लिंक
https://youtu.be/yUJhGFb6BMQ




वीरश्री वैद्य - करंदीकर

Thursday, October 5, 2017

...... आणि मावशी जगो...

#________आणि_मावशी_जगो
आईपेक्षा लहानपणी मुलांना मावशीनेच जास्त सांभाळलेले असते .
मावशी लहान असेल तर मग दंगा , मस्ती , खोड्या
असा डाम्रटपणा करायला त्यांना खुल्ली सूट मिळावी, म्हणून ती त्याच्यात सामील होते,
आईच्या वटारलेल्या डोळ्यांना मग कोणी भाव देत नै
( एकूण काय .... आईचे काsssही चालत नाही)
मावशी मोठी असेल तर ती लाड खूप करते, म्हणेल तो ड्रेस, म्हणेल तो पदार्थ खायला , म्हणेल तिथे फिरायला ....... कारण इथे आईवर डोळे वटारायचा अधिकार तिला असतो.
( इथेही ........आईचे काsssही चालत नाही)

               कसलीही मदत न करता उगाच फुकाचे सल्ले  देण्यात लोक व्यस्त असतात तेव्हा मावशी बाळाची शी धुण्यापासूनची कामे करण्यात बाळाच्या आईला मदत करत असते.
          न रागावता , न ओरडता मुलांच्या कलानी घेत त्यांना समजावून देत  चांगल्या सवयी लावण्यात मावशीचा हातखंडा असतो. ..... तुला सगळ्यात जास्त कोण आवडते???
असे भाचेकंपनीला  बुचकळ्यात टाकणारे प्रश्न ती विचारत नाही .  त्यांच्या  मनातली आपली जागा ती राखून असते.
         सारखे खेळणी , खाऊ , काही ना काही gift असले फसवे temptation न देता , न दाखवताही ती भाचेकंपनीची लाडकी होते.
मुलं निरागस असतात म्हणूनच कोण मायेने आपले करते ते त्यांनाही चांगले ठाऊक असते.

विंदा करंदीकर यांची एक छोटीशी पण बरीच बोलकी कविता

मावशी

सोलापूरहून
येते काकू;
माझ्यासाठीं
आणते चाकू.

कोल्हापूरहून
येते आत्ते;
माझ्यासाठी
आणते पत्ते.

राजापूरहून
मावशी येते;
माझा एक
पाप्पा घेते.

© वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, October 3, 2017

Sweet home

स्वतःचाच घरात बोअर झालंय किंवा कंटाळा आलाय असं कोणी म्हणालं की मला  फार फार आश्चर्य वाटायचं की असं कसं होऊ शकतं ?, ज्या घरात लहानपण घालवलंय त्या घरात  कंटाळा कसा येऊ शकतो ?
           शिक्षणासाठी मुलं परगावी जातात..... हळूहळू त्यांचे सामान कमी कमी व्हायला लागते ..... ते गेल्यावर त्यांच्या कप्प्यावर , जागांवर अतिक्रमण व्हायला सुरुवात होते .... स्टेशनरीच्या कप्यात स्क्रू ड्राईव्हर , खिळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू , चार्जर, बॅटरी इ. इ. असे काही समान जायला सुरुवात होते , कपडे कप्प्यात कोपऱ्यात सरकवले जातात ,  तो कप्पा extra वाले , आहेरात आलेले कपडे , शाली, टोप्या यांचाच होऊन जातो......मोठी झाली मुलं..... आता काय करायचेत स्केचपेन?, काय करणार त्या चकचकीत कागदांचे ? असे म्हणत म्हणत stationary वगैरे हळूहळू हद्दपार व्हायला सुरुवात होते .
           मुलांच्या या nostalgic , विरंगुळ्याच्या जागा कमी झाल्या , किंवा त्या जागेला भागीदार आले की मग करमेनासे होत असावे बहुतेक. मुलीचे दागिने , कपडे यांना आईच्या कप्प्यात जरातरी एखादी वेगळी जागा मिळते , पण बरेचदा मुलांचे तसे होत नसेल ..... आणि एव्हाना मित्रांची लग्न पण झालेली असतात, कुणी बाहेर set झालेला असतो , तर कुणाच्या priorities बदललेल्या असतात........ज्यांच्या घरी जाता यावे असे कोणी  नातेवाईक नसतात.......

शिक्षण , नोकरी निमित्त, बाहेर राहून सुदधा मला घरी नेहमीच करमायचे
कारण
ड्रॉवर मध्ये भरलेली भरपुर स्टेशनरी , क्राफ्ट चे समान , वेळोवेळी जमवलेले  चमकदार कागद , थर्माकोल चे गोळे , लेस , टिकल्या , विणकामाचे समान .... वगैरे वगैरे .....
   
याने मन भरलं की वाचायला भरपूर पुस्तके .....

 वाचायचा मूड नसेल तर बागकामाला वाव .....

  हे सुद्धा नको असेल तर घरात बागडणारे , खेळणारे मांजर

  मांजर बाहेर गेले असेल तर गच्चीवर ची मस्त हवा ......

मामा , मावशीकडे जाऊन गप्पाटप्पा........
 
    संध्याकाळी चौघे एकत्र जमलो की दिवसभरात काय झालेे याची देवाण घेवाण , चिडचिड / कटकट नाही....
   
       एखादा विनोदी सिनेमा किंवा विनोदी मलिका एकत्र बघणे ......... रोजच्या बातम्यांवर चर्चा......
वगैरे.........वगैरे........

,© वीरश्री वैद्य - करंदीकर

Wednesday, September 13, 2017

#Are_u_a_solution__Or_part_of_the_problem_?

एखादी emergency असणारी परिस्थिती म्हणजे accident , operation वगैरे........ . इथे खमक्या(कणखर) लोकांची फार फार गरज असते .
सुतकी चेहरा करून वावरणे, हातपाय गाळून बसणे, उगाच वाईट साईट विचार करणे अशाने ज्या व्यक्तीवर  emergancy ओढवली आहे त्याच्या भोवतीही एक उदासवाणे , निराशाजनक वातावरण पसरते.
            अशा वेळी तिथले वातावरण नीट करण्यासाठी खमक्या लोकांचा  positive attitute परिणामकारक ठरतो.
             खमके , कणखर म्हणजे कोरडे वा भावनाशून्य नव्हे. ( कारण असा अर्थ बरेच लोक काढतात.)
खरेतर खमकेपणा हा ज्यावर ही emergacy ओढवली असेल त्याच्या काळजीपोटीच येतो. ( rather तो यायला हवा )
 त्याच्या आजूबाजूचे negative वातावरण घालवणे ,भक्कम मानसिक आधार देणे या हेतूनेच येतो.  काही लोक जात्याच खमके असतात तर काहींना परिस्थिती बनवते.
              ज्या घरचे लोक खमके असतात तिथे व्यक्ती आपल्यावर आलेल्या अडचणी , office चे टेन्शन, इतर ताणतणाव मोकळेपणाने मांडू शकतो. अति काळजी असणाऱ्या घरात मुले इंडिपेंडंट झाली की घरच्यांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून आपले tensions साधे बोलतही नाहीत.
Generaly अति काळजी करणाऱ्या लोकांना high / low Bp वा heart problems असतात. आपल्या अडचणी सांगितल्या तर धीर मिळणे तर लांबच, यांचीच तब्येत बिघडून नवी emergancy नको, असा शहाणा विचार असतो यामागे.
              'तुम्ही / तो /ती आम्हाला काssही ( अडचणी, problems) सांगत नाही' अशी तक्रार करण्याआधी आपण तेवढे  सक्षम आहोत का,  हा विचार नक्कीच व्हायला हवा .

एक वाक्य फार पूर्वी वाचनात आले होते , ते या situation ला चपखल बसते
#Are_u_a_solution__Or_part_of_the_problem_?

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, August 15, 2017

नवरे येती स्वयंपाकघरा

#_नवरे_येती_स्वयंपाकघरा

काही नमुने :-

नवरा -भांडं कुठं आहे ?
बायको- खालच्या कप्प्यात.
नवरा - डाळीचे पीठ?
बायको - वरच्या कप्यात उजव्या बाजूला.
नवरा - चिरलेली भाजी?
बायको - फ्रीज मध्ये.
नवरा - मोठा डाव कुठे ठेवलास ?
बायको - ड्रॉवर मध्ये.
नवरा - मसाल्याचा डबा ?
बायको - ?????? 😠😠😠
              राहू दे मीच करते ......
******************************************
नवरा खिचडी करणार असतो.
कट्ट्यावरचे त्याने मांडलेले सामान
 तांदूळ , मुगाची डाळ, मिसळणाचा डबा , गुळाचा डबा    पाण्याचा ग्लास, मीठ , कोथींबीर, सूरी , डाव वगैरे

बायको - ( हे सगळं बघून ) काय कुकरी शो वाले येणारेत
                का ? खिचडीचं coverage घ्यायला ?  
             
*******************************************
नवऱ्याने पदार्थ करून झालेला , कट्टा (चक्क) स्वच्छ ,
 पण......
सिंक मध्ये भांड्यांचा डोंगर...chopping board , किसणी सुरी सकट....
*******************************************
बायको - जरा भाजी टाकता का?
नवरा -   बरं , पण मी माझ्या आवडत्या भांड्यात करणार.
  भाजी झाली
10 जणांची भाजी होईल एवढं मोठ्ठ भांडं (आवडतं☺)
 त्यावर काचेचं जड  झाकण

भाजी .... भांड्यांच्या तळाशी
********************************************
नवरा -    आज मी करतो (बनवतो )नाष्टा
बायको -  बरं , करून झाला की मला स्वयंपाकघर
              परत पूर्वीसारखं करून द्या .
*********************************************

दुर्मिळ किंवा काहींच्या स्वप्नातील नवरा
स्वयंपाक तयार ....
भांडी घासलेली......
गॅस , कट्टा साफ .....
**********************************************
© वीरश्री वैद्य - करंदीकर

Friday, August 4, 2017

Friendless

#_friendless
मैत्री दिनानिमित्त थोडेसे
माझ्या परिचितांपैकी एकाच्या मुलीनी , मुलाला कोणी मित्र नाहीत म्हणून लग्नाला नकार दिला. हल्ली मुलींच्या अटी फारच असतात , फारच igo असतो  हा माझा मुद्दा नाहीये.
     मुलीचे म्हणणे पडले त्याला कोणीही मित्र नाहीत , म्हणजे रोज उठून सगळ्या गोष्टींबद्दल तो माझ्याच डोक्याशी कटकट करणार.
      हे ऐकून मलाही वाटले होते की हे काय नकाराचे कारण असावे का? मुळात मित्र-मैत्रिणी (best friends) नसू शकतात हे काही पटेना , पण नंतर असे दोन नमुने समोर आले आणि पटले की अशीही माणसे असतात, याने एक पालक म्हणून मला विचारात पाडले.
       प्रगल्भता यायला , भावनांचा योग्य निचरा व्हायला , योग्य वयात समवयीन, समविचारी मित्र-मैत्रिणी अत्यंत आवश्यक असतात.
या friendless नमुन्यांबद्दल थोडे निरीक्षण मांडते......
      शाळेत ,कॉलेजमध्ये होते मित्र पण कुणी आता contact मध्ये नाही, अशी अवस्था असते. best friend वगैरे नसतात.
मग आई , वडील किंवा भावंडे यापैकीच कोणीतरी असे असते की ज्यांच्याशी ते मोकळेपणाने बोलतात. बरेचदा आईच असते.
आईच्याच डोक्याशी सगळे काही...
मुलांच्या बदलत्या वयानुसार त्यांचे मित्र होऊन समजून घेण्याची मानसिकता प्रत्येक आईची असतेच असे नाही.
 ( मुल कसेही असले तरी आई ला प्रिय त्यामुळे नीट मार्गदर्शन ,प्रसंगी कानउघडणी होतेच असे नाही)
       त्यातून यांच्यात अनेक न्यूनगंड निर्माण झालेले असतात.
हे बरेचदा attention सिकर असतात. भावंड असेल तर ते खूप लाडके आहे , असा समज असतो. हा समज दूर करण्यासाठी आईकडून अनेकदा फाजील लाड केले जातात.
माझ्यावर कसा अन्याय झालाय , असे सारखे सारखे उल्लेखात आणून ही मुले जन्मभर त्याचा फायदा घेत आईकडून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतात .
        त्यांचा स्वभावही चिडचिडा आणि कटकटी करणारा होऊन जातो , जरा काही मनाविरुद्ध झाले की सगळ्या घरभर कटकट करत फिरणे, आपल्याला सोडून बाकीचे सगळे मजा करतात, आपली कुणाला काही पडलेली नाही असे ग्रह करून घेणे , दुसऱ्याला त्रास होईल असे मुद्दाम वागण्याचा नतद्रष्टपणा करणे असे उद्योग सुरु होतात , आणि मग तो स्वभावच बनून जातो . मग अशा माणसांशी बोलायला तरी आवडेल का कुणाला ?
         यावरचढ आईची पाठराखण , लहानपणी समवयीन मुले मुली खेळायला नव्हती ( मग शाळा ,कॉलेज मध्ये काय होते?),
काही आयाना हा अभिमान असतो आपल्या मुलांच्या आयुष्यात फक्त आपणच खूप महत्वाचे माणूस आहोत.
खरे तर ही अभिमानाची नाही , विचार करण्याची गोष्ट आहे.
मित्र - मैत्रीण नसणे ही गोष्ट व्यक्तिमत्वात अनेक negetive बदल लहानपणापासूनच आणते. (Iike slow poisoning)
        असे लोक पाहिल्यावर वाटते  त्या मुलीने योग्य निर्णय घेतला.
           सध्या इथे फार मित्र-मैत्रीण नसणारी , आत्मकेंद्रित मुले मी पाहत आहे , किमान 5 वर्षाची झाल्यावर तरी खाऊ वाटून खाणे , खेळणी share करणे हे सुद्धा ती मुळीच करत नाहीत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पालक म्हणून मला पडलेले काही प्रश्न

* हे असे नेमके friendless कसे काय होतात?
* इतके की वयाची चाळीशी आली तरी याना मित्र का असू नयेत ???
*  आपली मुले अशी होऊ नयेत यासाठी पालक म्हणून काय करता येईल ?
* माझ्या मुलांना योग्य मित्र शोधायला / निवडायला  मदत कशी करता येईल?

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, July 24, 2017

सुदिनम्|

लहानपणी वाढदिवस असलेला दिवस खूप छान असायचा . वाढदिवसामुळे मोठं कोणी ओरडायचं नाही, खेळांत पण कुणी birthday boy/girl ला चिडवायचं, त्यांच्याशी भांडायचं नाही .........फक्त त्या दिवासापुरतं......
        ज्याचा वाढदिवस असेल त्याच्या घरी संध्याकाळी बोलावणं  असायचं ........त्यातल्या त्यात नवीन कपडे घालून ( कारण नवे कपडे हट्ट करून आधीच काही वेळा घालून घेतलेले असायचे , मग त्यातल्या त्यात कमी वापरलेला ड्रेस घालून ) त्याच्या घरी जायचे , गिफ्ट घेऊन .......
कोणी पेन्सिल, कंपास बॉक्स, बिस्किटाचा पूडा , असे काही बाही आणायचे.
क्रिम चे decoration असलेला केक बघायलाच खूप छान वाटायचा,..........ताजा वगैरे असण्याची गरज नसायची.
त्यावर डेकोरेशन केलेल्या फुलाचा piece आपल्यालाच यावा अशी इच्छा मनात केककडे बघून मागितली जायची.
 केक कापणे , गिफ्ट देणे , कार्यक्रम व्हायचा ,यात टाळ्या वाजवताना birthday boy/ girl ऐवजी केक कडेच जास्त लक्ष असायचे . लिम्लेटच्या गोळ्या, पार्लेG ची चॉकलेट हीच के ती रिटर्न गिफ्ट.
                   मग paper डिश मध्ये फरसाण किंवा तत्सम चिवडा जिलबी आणि केकचा छोटासा piece यायचा, ते क्रिमचं फुल नाही पण पानांचे तुकडे - बिकडे असायचे , तेवढंच आपलं समाधान..........खायला सुरुवात जिलबीला केकचे क्रिम यापासून व्हायची.
केक आणि चिवडा एकदम संपला पाहिजे असा निर्धार करून खायला सुरुवात करायचो ( निर्धारच करावा लागायचा कारण केकच आधी संपणार हे माहीत असायचे ).
काहीजण फरसाण / चिवडा पटापट खाऊन घ्यायची आणि
" काकू , संपलं " असे म्हणून अजून घेऊन यायची , काहींचं निम्मं पण संपलेलं नसायचं. दुसऱ्यांदा आणलेला फरसाण /चिवडा काही संपायचे नाही . मग ठरलेले वाक्य
 " काकू घरी घेऊन जाऊ?" काकू काय म्हणणार " ने" .
त्याची री ओढत आपण पण तसंच विचारायचं, कारण केक संपलेला असायचा. मग ते पेपर डिश मध्ये तसंच न सांडता हळूहळू चालत घरी घेऊन यायचं.
         झोपही मग कसल्याशा आनंदात लागायची.

          परवाच एका गोड मैत्रिणीच्या गोड मुलाच्या वाढदिवसाला गेलो होतो तेव्हा आठवलं हे सारं.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Friday, July 21, 2017

वाचनवेड

#_वाचनवेड
हल्ली बऱ्याच मुलांना वाचनाची आवड नसते. Electronic media दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याचा खूप मोठा पगडा आहेच , त्याचबरोबर आई-वडिलांनाच ती आवड नसणे हे पण मुख्य कारण आहे. घरात कधी कोणाला वाचताना बघितलेच नसेल तर मुले तरी का घेतील हातात पुस्तके ?
        काहीवेळा आई वडीलांपैकी एकाला आवड असली तरी मुलांना असतेच असे नाही . आई होण्याचा विचार असतानाच हे  आणि यासारखे काही प्रश्न मनात येत होते .
'आपल्यासारखी आवड आपल्या मुलाला लागेल का ? '
'त्याचा interest असेल का ?'  'त्याची आवड निर्माण व्हायला काय बरे करता येईल ?'
याचे उत्तर मला वाचनाची आवड का लागली यात होते.
ज्यांनी माझ्यात ही आवड निर्माण केली ते माझे वडील म्हणतात की,  '
मुले बोलायला लागली की त्यांना गोष्टी सांगायला सुरुवात करायची . वाढत्या वयानुसार त्यांचे interest , वाढत जाणारे आकलन लक्षात घेऊन त्यात बदल करायचे ,
म्हणजे लहान असतात तेव्हा प्राण्यांच्या गोष्टी ,नंतर राजाच्या,  जादूच्या , मग moral stories इसापनीती सारख्या असे करत जायचे .  हे सगळे करताना आपला गोष्टींचा साठा वाढवत जायचा. .... त्याना मध्ये मध्ये गोष्टी वाचूनही दाखवायच्या ..... मग वाचता यायला लागल्यावर त्यांना स्वतः गोष्टी वाचायची आवड लागते . इ• ४ थी ते ७ वी या वयोगटात असतानाच वाचनाची  चटक  लागली  तरच ते चांगले वाचक बनतात. प्रौढ वयात ही आवड निर्माण  करता येत नाही. ', इति बाबा.
             वाचक आई - वडिलांना मुले पण आपल्यासारखा पुस्तक खाणारी (वाचणारी) व्हावी असे वाटणे स्वाभाविक आहे  . पुस्तक खाऊन काय मिळते हे खाल्ल्यावरच कळते. आपल्या व्यक्तिमत्वात अंतर्बाह्य , positive बदल चांगली पुस्तके घडवतात.
           " मला पुस्तक वगैरे वाचायला आवडत नाही " असे अभिमानाने सांगणारी माणसे माझ्या पाहण्यात आहेत.
(ज्या गोष्टीबद्दल खंत वा वाईट वाटले पाहिजे त्या अभिमानाने कसल्या सांगता? )आणि वाचनाची आवड का नाही हे explain करणारे त्यांचे आई - बाबा सुद्धा .
 ' मी कॉमर्स / सायन्स ला होते / होते.
 ' english medium ला होतो/ होते.
तर पालक ----
' खूप अभ्यास असतो, त्यातून शाळा गुरुकुल type आहे.
' शाळेत स्पोर्ट्स आणि इतर activity असतात की personality development ला.( त्यासाठी पुस्तके कशाला?
काही कॉमन कारणे ---
'वेळच मिळत नाही.'
'वाचायला सुरुवात  केली की झोप येते.'
'फेसबुक whatsapp वरील वाचन पुरेसे आहे.'
'नोकरीतून रिटायर झाल्यावर वाचायचेच आहे.'
'आता आम्हाला मराठी वर्ड्स  व त्यांचे मिनिंग्ज रिमेंबर करायला डिफिकल्ट जातं.' ( मग English books वाचा , त्यांचीही बोंब).

            असली लटकी कारणे ' वाचन ' या माणसाच्या महत्वाच्या गरजेसाठी कशी काय देऊ शकतात याचे नवल वाटते.  एकूणच वाचनात no interest.
 " पुस्तक वाचणे आणि त्यावर चर्चा करणे" हे वाक्य जणू काही
 "प्यायला बसतात आणि नंतर बरळत असतात " अशा प्रकारच्या हेटाळणीच्या सुरात मी ऐकलेले आहे ,
आधी राग आला , पण नंतर कीव.......
कारण हे खालचे चित्र या बाबतीत बऱ्यापैकी बोलके आहे.

@वीरश्री वैद्य - करंदीकर


Wednesday, July 19, 2017

मूल झाल्यापासून ते किमान 4-5 वर्षाचे होईपर्यंत त्या आईला असंख्य माणसे असंख्य सल्ले देत असतात .
त्यापैकी काहीच माणसांचे सल्ले हे अचूक असतात .
( ४० - ५० सल्ले देणे , मग त्यातला एक बरोबर आल्यावर , "बघ तरी मी म्हणत होते/होतो", ही असली माणसे या अचूक सल्ले या विभागामध्ये मोडत नाहीत).
        यांचा मुख्य सल्ला criteria म्हणजे बाळाचा आकार , बाळ healthy हवे याचा अर्थ निरोगी असा न घेता, गुबगुबीत घेतला जातो.
 मग बाळ अंगाने बारीक असेल ( भले त्याचे वजन प्रमाणात का असेना)  त्याला गुबगुबीत करण्याचे असंख्य सल्ले चकटफु मिळतात.
त्याला कसं खाऊ घालायचं , लंगोट घाल , diaper नको ( किंवा vice versa), शी होत नाही का? , अमक देत जा , पातळ झाली की लगेच तमकं देत जा, सर्दी कशी झाली ?
बांधलं नव्हतं का डोक्याला?  , sweater घाल लगेच ,
 ड्रायफ्रूट दे , खजुर देच, अंड नाहीं खात, मग पनीर देच.
खात नाही , उलटी काढतो ?असं कसं काढतो ?
,घालायचं दामटून, थांब मी दाखवते / दाखवतो.

       या सगळ्या सल्ल्यांमध्ये आईला जराही उसंत मिळूच नये असं टाईट शेड्युलच सांगत असतात काहींजण....
या सल्ल्यांच्या गर्दीने आई म्हणून तिला निसर्गतः मिळालेले बेसिक instict कामच करत नाहीत.
           दुसऱ्या बाजूला आईची कामं ही आईलाच करावी लागतात , दमटून खायला घालणे या प्रकरणात उलटी , शी यांनी खराब झालेले सगळे काही आईलाच साफ करावे लागते , ते ही लगेच .......ते करायला ना सल्ले देणारे येतात,............ ना खायला घालून दाखवणारे

   कहर तर तेव्हा होतो जेव्हा मूल सांभाळण्याचा काहीही अनुभव नसणाऱ्या ( नवीन लग्न झालेल्या अर्ध्या हळकुंडाच्या...... ') 'डायपर काढून त्याला मोकळे ठेव' , मी घातली आहे ना तशी मऊ ओढणी पांघरत जा 'असले काही म्हणतात ( तेव्हा मनात ' शु - शी तू काढणार आहेस का ?' असे येतेच)........

      आता काही पूर्वीसारखी 9 - 12 व्या वर्षी लग्न होत नाहीत . आई होण्याचा विचार चालू असताना , पूर्ण medical check up करणे, निरोगी मातृत्व, गर्भसंस्कार या सगळ्याची माहिती मुली बऱ्यापैकी घेतात . बाळ आई वर अवलंबून असेपर्यंत काय काय करायचे याची मानसिक तयारी ते पोटातील बाळ , ते नऊ महिने , त्याच्या कळा या काळात होते .
( काही अपवाद असू शकतील पण निसर्गतः मादीमध्ये हे आईपण उपजतच असते).
याही पलीकडे अनुभवी माणसे महत्वाची आहेतच, अगदी कळेनासे झाले , काही भीती वाटली की नवीन आया विचारतातच , तेव्हा द्या सल्ला किंवा सांगा उपाय .
        पण या सल्ले देणाऱ्यांपैकी ( यात अनुभवी पण आली)  2 ते 3 % माणसेच अचूक सल्ला देतात. या माणसांबाबत माझे एक निरीक्षण सांगते . हे आल्या आल्या सल्ल्यांचा भडिमार करत नाहीत.
 "बाळ रडतय? मग वुडवर्ड्स ग्राईप वॉटर दे त्याला मी त्याच्या बाबाना आणि त्यांची आई तुझ्या बाबाना हेच देत होती",
( जसा काही खानदानी रिवाज असावा) असलं काही म्हणत नाहीत .
आई-बाळाचे रुटीन , त्याची अंगकाठी, झोप, भूक, आलेली अनुवंशिकता याचे एक-दोन दिवस अगदी बारीक observation करतात . आई कुठे अडतेय, तिला नेमकी कशात मदत वा अनुभवी सल्ला हवाय हे ओळखतात.
मग अशावेळेला मिळालेला सल्ला साहजिकच अचूक आणि रामबाण असतो.
माझ्या माहितीतल्या अशा बायकांनी त्यांची स्वतःची डिलिव्हरीच्या वेळेचा अंदाजही आला होता , त्या वेळी त्या स्वतःच जाऊन ऍडमिट होऊन , थोड्या वेळातच बाळाला जन्म दिलेल्या आहेत........

@वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, July 10, 2017

काजवे

आज खूप वर्षांनी काजवे पाहिले ( चमकले नाही पाहिले)आणि मनाला आलेली मरगळ दूर झाली.
    सकाळी इथे पाऊस पडून गेला ,जमीन भुसभुशीत झाली ,मातीत गारवा आला. खूप दिवसांनी कामे लवकर आटोपली आणि बाल्कनी मध्ये बसायला मिळाले ......
आणि लक्षात आले की समोर पार्क मध्ये काजवे दिसत आहेत. खात्री झाली तेव्हा जुने काहीतरी गवसल्याचा आनंद झाला.

        वेन्नानागर ला राहायचो तेव्हा खूपदा पाहिलेले, तिथे काजवे दिसणं ही खूपच comman गोष्ट होती.
मग ते बाटलीत पकडणे....तोंडात धरून चेहऱ्याचे भूत करणे हे खेळ त्याबरोबरच आले....
आजी सांगायची तिचे आजोबा धोतराच्या सोग्यात काजवे अलगद पकडून त्याचा बॅटरी सारखा उपयोग करायचे .....  मजा वाटायची तेव्हा .........

          १०-१५ वर्षांनी ते पुन्हा दिसले आज ......

    ' कट्यार काळजात घुसली' सिनेमातील ' मनमंदिरा...' गाण्याने आठवण करून दिली होती काजव्यांची...
तो सिनेमा गाजला त्या दरम्यान ' असे कीटक खरच असतात का ?' असा प्रश्न विचारलेला कानावर आला,
 तेव्हा ' म्हणजे तुम्हाला माहीत नाही?' च्या आश्चर्याबरोबर वाईट ही वाटले .
निसर्गाची ही किमया प्रदूषणाने इतकी दुर्मिळ व्हावी की काजव्यांना बघणे सोडा पण यांच्याबद्दल ऐकलेले पण नसावे?
लगेच पुढचा विचार आला ......
' म्हणजे उद्या माझ्या मुलालाही ( 'सव्य' ला )हे बघायला नाहीच मिळणार का कधी ?'
" आमच्या लहानपणी मागे light असणारे किडे होते ," अशी नुसतेच fantacy वाटणारे सांगावे लागणार असे वाटत होते .
         मी माझ्या शालेय वयात गो. नि. दांडेकरांच्या भ्रमंती वर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये ' भिजल्यावर चमकणारे लाकूड....
भुंग्यानी पोखरलेले बांबू बनात वारे शिरल्यावर बासरीचा आवाज काढत होते .......
असे काहीबाही निसर्गाची किमया वाटणारे अनुभव वाचले होते.
मी काजव्यांबद्दल सांगेन तेव्हा माझ्या मुलाला पण असेच वाटेल कदाचित .... असंच वाटलं होतं.

          आशेचा किरण चमकणे हा वाक्प्रचार काजव्यांवरूनच घेतला असावा बहुतेक .....…...मला इतक्या वर्षांनी दिसले
म्हणजे माझ्या मुलालाही कधी ना कधी दिसतील हे जाणवलं ....

@ वीरश्री वैद्य - करंदीकर



Thursday, July 6, 2017

इथे सध्या summer चालू आहे . घरातूनच समोरचा पार्क दिसतो. बऱ्याच भारतीय लोकांचे ज्येष्ठ आई - वडील आलेले दिसतात . बघून खूप बरे वाटते.
         या इथे येणाऱ्या आई वडिलांचे मला कौतुक आहे ते याचसाठी की
' , आम्ही काही येणार नाही ....... तुम्हीच या ......
 आम्हाला भीती वाटते.............आम्हाला नाही करमणार..... किंवा आम्हाला आमचे घर सोडून दुसरीकडे कुठे कुठे करमत नाही. ............असली कारणे ना देता ,
 जशी मुले सुट्टी-सणावाराला ( वरची कुठलीही कारणे न देता ) घरी येतात तसेच इथे आले आहेत म्हणून.  

इथे येणाऱ्या आई-वडीलांपैकीपैकी बरेचजण तर कदाचित भारतात  राज्याबाहेरही गेले नसतील .......
बरेच जणांना english येत नसेल...........
बाहेर वागण्याबोलण्याचा confidence ही नसेल कदाचित , पण तरीही लाडक्या मुलांसाठी ( यात मुलगा-मुलगी दोन्हीही आले) ते या सगळ्या न्यूनगंडावर मात करून 25 ते 30 तासाचा विमानप्रवास करून  आले त्याच खरंच कौतुक...!
         
               जसे आई - वडिलांना मुलांची आठवण येते ,ती जवळ असावे असे वाटते , त्याप्रमाणे मुलांनाही येतेच की , म्हणून तर ती सणावारी सुट्टी मिळाली की गावातल्या
आई-बाबांकडे धावत येतात. अगदी पुण्या-मुबई मध्ये शहरापासून लांब उपनगरात राहणारे सुद्धा सुट्टी मिळाली की मुख्य गावभागात राहणाऱ्या आपल्या आई-बाबांकडे येतात.
 अगदी तसेच....... इथे येणारे आई - बाबा करतात.😊

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, June 26, 2017

'ME' time

               प्रत्येकीने स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे , विशेषतः लग्नानंतर...........आधी नवा संसार आणि नंतर मुलं त्यामुळे वेळच मिळत नाही....हे पालुपद 90% बायका हमखास वापरतात........सकाळ पासून संध्याकाळ पर्यँत घरची कामे , पोरांचे खाणे - पिणे, यातच कसा वेळ जातो याचीच चर्चा करतात.....भेटल्यावरही. (जणू काही जगातले सगळे दुसरे विषय बॅन आहेत )
        जोपर्यत मुले लहान असतात, आपल्यावर अवलंबून असतात तोपर्यंत काही वाटत नाही.
पण ती जेव्हा independent होतात ........त्यांचे जग विस्तारत जाते .........त्यावेळी आई जवळ भरपूर रिकामा वेळ राहतो आणि तो खायला उठतो.
                मग आधी खूप वर्ष बऱ्याच गोष्टी मागे पडलेल्या असतात छंद, आवडीनिवडी इ. इ.
काहीतरी घटना , निमित्ताने त्या आठवतात नाहीतर एव्हाना त्याचा पूर्ण विसर पडलेला असतो ......... त्याकडे परत जावं तर ते out of syllabus वाटते नाहीतर आपण तरी त्या गोष्टीच्या out of syllabus वाटायला लागतो.
कारण छंद, आवडीनिवडी यांना सुद्धा upadation असतात , ती करावी लागतात.
हा परत जायचा मार्ग अनेकजणीना मिळत नाही.....
नक्की आपल्याला काय हवंय कळत नाही ........
सगळंच बिनसतं मनात......
          एव्हाना एक चाकोरीबद्ध आयुष्य आणि रुटीन नकळत तयार झालेले असते...... मग बाकीचे लोक पण तुम्हाला त्याच पद्धतीने गृहीत धरायला लागतात.(याला कारण तुम्हीच असता)
          एखाद्या कोणाला आपल्यासारखीच आवड , किंवा छंद असल्यास "मी पण आधी करायचे " हे वाक्य तुम्हाला कितीही nostaligic वाटलं तरी समोरच्याला ते एकतर बोअर वाटतं किंवा खोटं.
ज्यांना सारखं सारखं घर आवरणे आणि सारखं सारखं नवीन काहीतरी स्वयंपाकात करणे हे दोनच छंद असतील , त्यांच्यासाठी ही पोस्ट नाहीच , कारण त्यांना हे रिकामेपण येणार नाही कदाचित.

मग आल्यागेल्याचे करा ,त्यांना खाऊ बांधून द्या, डबे भरून द्या,  पुन्हा पुढच्या येणाऱ्यांची तयारी करा, असे सगळे करता करता आपला जन्मच पुड्या बांधण्यासाठी असे स्वतः लाच पटवून द्यायची वेळ येते .
         बोलताना कायम आपल्या घरच्यांचे आणि मुलांचे सांगत बसणं........सकाळी ही भाजी न संध्याकाळी ती.........   एखादे दुःख घेऊन कुरवाळत बसणं ....त्यावर sympathy मिळवण ..... काही नाही तर रटाळ सीरिअल वर चर्चा..... असले विषय तुम्हाला त्याच मनस्थितीत अडकवून ठेवतात.
        आपला आनंद आणि inner piece टिकवून ठेवायचा असेल तर आपले छंद , आवडीनिवडी यांना वेळ द्या. ज्यांची मुले लहान आहेत त्यांना रोज देणे शक्य नसेल , मग आठवड्यातून दोनदा ,तीनदा एखादा तास तरी स्वतः साठी नक्की काढाच. वेळ न मिळण्याचे अनेक बहाणे असतात, कारण तो मिळत नाही ..... काढावा लागतो....
वेगळा वेळ काढायचा तर ठरवलेली कामं राहणार हे तर आलेच.....मग त्या praorities ठरवा पण स्वतः साठी वेळ काढाच......
@वीरश्री वैद्य - करंदीकर


Wednesday, June 21, 2017

खरा मान-पान

#_खरा_मान_पान

आपल्या कडे सण समारंभ यात मान - पानाची पद्धत आहे. या मान - पानात कपडे दिले जातात सुवासिनींची ओटी भरली जाते. पूर्वी ओटीत खण, नारळ, तांदूळ द्यायची पद्धत होती. शिजविण्यास उपयोगी म्हणून तांदूळ , नारळ आणि शिवण्याकरता उपयोगी म्हणून चोळी दिली जायची.
आज त्याची जागा ब्लाउज पिस ने घेतली आहे.
            काही घरातून मात्र या मान- पानाचे अति अवडंबर केले जाते. अगदी मंगळागौर, डोहाळेजेवण किंवा घरातील पूजा यातही मान-पान होताना दिसतो.
मला यामागे यजमान व्यक्तिचा नेमका काय हेतू आहे ते कळत नाही. कारण बरेचदा या मान- पानात पक्षपातिपणा  दिसतो. म्हणजे जवळच्या व्यक्तीना चांगले तर लांबच्या वा नावडत्या व्यक्तीला बरे अशी क्रमवारी पडते.
 मग दिले याचे मानसिक समाधान हवे ........ का सगळे प्रथेप्रमाणे करतात याचे कौतुक हवे असते ???
तेच कळत नाही.
बरे! सगळ्यांचे सगळे केले पाहिजे असा यांचा सुर असतो ,
 मग तूम्ही कर्तव्य म्हणून करता तर कौतुक किंवा परतफेडीची अपेक्षा का?........  तुमचे कर्तव्य तुम्ही करा बाकीच्यांचे त्यांचें ते बघून घेतील.
पण असे होतच नाही.
              यजमान ज्यांना देतात त्यांच्याकडून मिळण्याची सुप्त इच्छा हि यांच्या मनात असते. ..........नुसते मिळण्याची नाही तर चांगले मिळण्याची............मुळात त्यांची ही इच्छा पूर्ण  व्हायला त्यानी स्वतःनी काही  निःपक्षपातीपणाने मान-पान केलेले नसतात..................मग कुचाळक्या सुरु होतात.... मी दिलेले असे तर त्यानी दिलेले तसे.................
बरेचदा न आवडलेले किंवा हलके दागिने वा कपडे फिरवले जातात.
असे म्हणतात 'देउन द्यावे ते चांगले द्यावे'.
मी त्याही पुढे जाऊन असे म्हणेन की आपल्या आनंदासाठी द्यावे,..... अपेक्षा न करता , ........ना कौतुकाची , ........
ना परतफेडिची .
"मी दिले , मला त्याच्या आनंद आहे ...... मी माझ्या आनंदासाठी दिले" असेच मनाशी म्हणालो तर अपेक्षा राहणार नाही आणि आपण जे केले त्याचा  निर्भेळ, सुखमय आनंदच वाट्याला येइल.
         मुळात जे सधन आहेत ज्याच्याघरी कपड्यांचे , दागिन्यांचे गठ्ठे लागले आहेत त्यांना देण्यापेक्षा ज्यांच्याकडे नाही अशाना दिलेले काय वाईट??
ज्यासाठी तुम्ही हे सगळे करता म्हणजे
'आनंद', 'आशिर्वाद' , 'कौतुक'  या तीनही गोष्टी तुम्हाला मिळतील .
उदा. महत्त्वाचे एक-दोन समारंभ सोडले तर हि देवाणघेवाण परस्पर सामंजस्याने बंद करावी आणि यात लागणारा पैसा एखाद्या समाजसेवी संस्था ना द्यावा.......
 माणसांसाठीच काय पण प्राण्यांसाठी काम करणाऱ्याही अनेक संस्था, संघटना आहेत. त्यांना मदत करावी. पैशाच्या स्वरूपात करायाची नसेल तर अन्न,औषधे या स्वरूपात करावी.
             माझी आज्जी दरवर्षी रीतिप्रमाणे दिवाळसण , अधिकवाण करायची. एका वर्षी माझ्या बाबांनी तिला सांगितले कि ज्यांच्या घरीं आहे त्याना देण्यापेक्षा ते पैसे ज्याचे कपडे घेता ते एखाद्या आश्रमाला द्या.
आज्जीनेही जावयाचे कौतुक करत किंवा असे म्हणूया त्याच्या मान राखत तसे प्रत्येक वर्षी केले. असे कितीतरी लोक करत असतील , पण हे माझ्या घरचे उदा. आहे त्यामुळे मला महित आहे. मला त्या दोघांचे माणूस म्हणुन कौतुक आहेच पण जास्त कौतुक यासाठी आहे कि पारंपारिक रीत सोडून दुसरे करताना लोक काय म्हणतील ? किंवा आज्जी नेही ' मुलीच्या सासर कडचे काय म्हणतील ' ? असा विचार न करता जे योग्य  , जे मनाला पटले तेच केले.
   सुजाण नागरीक , सज्जन माणूस , भला माणूस अशी नुसती विशेषणे आपण ऐकत असतो. आपण पण असे काही काम करून आपल्याच नजरेत भले व्हायला काय हरकत आहे?
       विचारधारेत मोठी तफावत असण्यार्या  माणसाना हे पटवून देणे अवघड आहे. पण आपण स्वतः असे करु शकतो आणि आपल्या पुढच्या पिढीला तसे  पटवून देणे आपल्या हातात आहे .
मुलांच्या हातूनच एखाद्या आश्रमात कपडे वा खाऊ वाटप करताना किंवा वृद्धाश्रमातील एखाद्या पंक्तीत स्वतःच्या हाताने वाढताना मला , माझ्या मुलाना जे समाधान मिळेल त्याची तुलना कशाशीच होउ शकत नाही आणि अशा आनंदात लोक काय म्हणतील हा विचार आसपास फिरकतच नाही.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, June 13, 2017

मध्यमार्ग

#_मध्यमार्ग_#
मुलांना शिक्षण english मधून का मराठी मधून हा विषय वादातीत आहे . अमेरिका ,युरोप ला जायचे शिकायला तर इंग्लिश आवश्यक आहे ... त्याचबरोबर मातृभाषा सुद्धा....... यातून मध्यमार्ग काढलेले एक उदाहरण आहे ते share करते, भविष्यात माझ्या मुलांसाठीही मी असेच करेन.....
            आता मुलांना सरसकट english medium च्या शाळेत घातले जाते. यापैकी बऱ्याच  मुलांच्या आई-वडिलांना येणारे english बघितले तर अजूनही काहींचे b आणि d मध्ये confusion असते.

'आपल्याला english येत नव्हते , नाहीतर आपण फार चांगले करिअर केले असते  , मग मुलाना  तरी चांगले explosure मिळावे' असा हेतू हे आई वडील सांगतात.
यात मुलाला ते सोपे जाईल का ?...
त्यात आलेल्या शंका त्याने आपल्याला विचारल्या तर आपण त्यांचे समाधान करू शकू का ? ......
 रोज घरी येऊन मूल नेमके काय अभ्यास करत आहे हे तरी आपल्याला  कळेल का ? ......
 मुलाला आपल्यासारखीच english समजायला अडचण येत असेल , तर त्याला 'नेमके काय समजत नाही?', हे आपल्या लक्षात येईल का ?
असले कोणतेच विचार हे लोक का करत नाहीत ?????
       
        घरात मराठी ( त्यातही प्रकार, कारण 12 मैलावर बदलणारी भाषा), शाळेत english ( त्यातही ब्रिटिश का अमेरिकन हा घोळ) किंवा हिंदी वापरली जाते . अशाने एकही भाषा पक्की होत नाही.
English मध्ये हजार चुका, आणि मातृभाषा तर नीट वाचता ही येत नाही ......सगळा धेडगुजरी कारभार .......

त्यामुळे कित्येकदा मुलाला आपल्या भावना समोरच्यापर्यंत नीट मांडताच येत नाहीत, त्याच्या दृष्टीने त्या क्लिअर असल्या तरी समोरच्याला या भाषेच्या सरमिसळी ने नीट कळत नाहीत.
        मुळात तुमची मातृभाषा पक्की असेल तर त्याच्या बळावर तुम्ही इतर भाषा खूप चांगल्या शिकू शकता.
 मूळच बळकट नसेल तर ते मूल रुजणार तरी कुठे आणि कसे ?
      अजून एक अक्षरही बोलता येत नाही आणि आई-बाबा मुलांना 'क्लॅप क्लॅप' , 'नोझी नोझी 'करा हे शिकवतात ,.
उद्या त्याच मुलाने त्याचे spelling विचारले तर येईल का यांना???  ही शंका येते मला अशा लोकांकडे पाहून.
      English is must,  ते आलेच पाहिजे ,नाहीतर मुले या धावत्या जगात टिकणार कशी? वगैरे हे प्रश्न तर ओघाने आलेच. आपल्या देशाइतका english च बाऊ करणारा दुसरा देश नसावाच बहुतेक.
      मला इतकेच म्हणायचंय की तुम्ही दुसरी कोणतीही भाषा शिकताना आधी मातृभाषेचा base पक्का पाहिजे.
नाहीतर मग आहेच 'एक ना धड............'

      आमच्या family डॉक्टर Shraddha Pingle नी त्याच्या मुलीला 'गार्गी' ला  मराठी शाळेत घातले ,
त्यांचे मत आहे की मुलांचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे, पण english पण आवश्यक म्हणून
त्याचबरोबर तिला घरात english बोलणे शिकवायला सुरुवात केली . तिची ग्रहणशक्ती , ...आकलन, ...आवड......
 हे सगळे विचारात घेऊन, अगदी छोट्या छोट्या वाक्यांपासून जसे की ,
'Come here' , 'go to bed' पासून सुरुवात केली.

आज ती सातवी मध्ये आहे , सहज , सोपे आणि छान english बोलते. तिच्याइतका simple present tense चा सुंदर वापर माझ्याबरोबर B.A.english मधून झालेल्या  batchmates ना सुद्धा येत नाही.
     English शिकण्याचे आणि शिकवण्याचे हे उत्तम उदाहरण मला वाटते, ते ही मातृभाषेची कास न सोडता.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, June 6, 2017

#मनमोकळे

#मनमोकळे

कधीकधी समोरचा आपल्याला जे सांगत असतो ना त्यावर...... आपला सल्ला , प्रतिक्रिया असं काहीही त्याला नको असतं.....
त्याच्या डोक्यात अनेक विचार , घटना यांचा गुंता झालेला असतो ........... ते वेगळ्या करून त्याला तो सोडवायचा असतो ....
 या गुंत्यामध्ये काहींची दुःख, ..काही वेडगळ घटना , ......काही मजेदार गुपितं,...... काही हास्यास्पद गोष्टी, ...
काही enjoyable आठवणी ..........असं बरंच काही असतं.
   
        ऐकणारा जर good listener असेल त्याला  हे सगळं आपल्याला सांगण्यामागे काय अपेक्षित आहे हे नीट ओळखता येतं.
   
        प्रत्येकाला असा एक listener हवा असतो .... ज्याच्याकडे या गुंत्यातून मोकळं होता येईल,......जो सांगितलेल्या सगळ्या घटनांचा स्वतः ला त्रास करून न घेता ...... किंवा ते आणखी चार लोकांना as a gossip म्हणून न सांगता स्वतः च्या मनात  त्याचा योग्य निचरा करू शकेल ............
पालपाचोळा , शिळे अन्न इ.चा योग्य निचरा झाला की कसे कंपोस्ट खत तयार होते तसे काही करणारा.........

@वीरश्री वैद्य - करंदीकर



Monday, June 5, 2017

Choice

#choice
काही लोकांना आपल्याच खरेदी , choice वर भरवसा नसतो. दुकानातच ते जाम confuse असतात किंवा असल्याचं भासवतात तरी ....... अमुक एक घेऊन आलो तर ते मला आवडलाय का ?..... चांगलं दिसतंय का ?
यापेक्षा पण लोक चांगले म्हणतील का? लोकांना आवडेल का ? याची काळजी यांना जास्त असते......
आणलेली खरेदी वापरायला काढली आणि लोकांनी जर काहीच  compliment नाहीच दिली तर हे स्वतःच विचारतात , कसं आहे? किंवा चांगलं दिसत नाही का ?
जर लोक मस्त किंवा छान म्हणाले तर यांचा इगो जाम सुखावला जातो ,
लोक ठीक आहे असं म्हणाले किंवा यापेक्षा अमुक तमुक छान वाटलं असं म्हणले तर मात्र ही मंडळी जाम depress होतात ........ती लोकांना न आवडलेली खरेदी कपाटाच्या कोपऱ्यात किंवा माळावर टाकून देतात , न काढण्यासाठी.....
     मी काय म्हणते मग चार लोकांना घेऊनच जावं ना शॉपिंग ला त्यांना काय आवडेल तीच खरेदी करावी आणि तेच वापरावं ......त्यांच्या choice ने घेतल्यामुळे ते चांगलच म्हणणार ....... हो की नै !😊
#So_simple_#

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Sunday, May 28, 2017

गुणग्राहकता

#गुणग्राहकता#

एखाद्याला एखादी  छान idea किंवा suggestions द्यावे आणि त्यातला मूळ मुद्दा,...मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सगळे बाजूला पडून........
त्या चांगल्या मांडलेल्या आयडियाचा एखादा न पटलेला मुद्दा , कसा चुकीचा होता ,
हेच फक्त आडून पुन्हा पुन्हा ऐकवले जाते तेंव्हा

का आयडिया दिली? ( मदत करण्याचा का प्रयत्न केला?) , पुन्हा करशील?
असे स्वतः चे कान पकडून स्वतःला बजावून सांगावे असे वाटते.
या प्रकारचा अनुभव बरेच जणांना असेल......
       
                पण एखाद्या माणसात गुणग्राहकता ( Imbibing ones qualities)  नाही हे अशाच काही अनुभवांनी कळते.

त. टी. Thank u Ketki Kathale  विस्मरणात गेलेला
' गुणग्राहकता ' हा शब्द आणि सगळ्यांनी आत्मसात करावा असा परमोच्च गुण पुन्हा आठवून दिल्याबद्दल,,,,👍

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, May 22, 2017

#interest#
अभ्यास न करणाऱ्या मुलांबद्दल चर्चा करायला बोलावल्यावर अनेकदा मुलांचे पालक हे वाक्य बोलतात ,
 "तो / ती खूप हुशार आहे हो पण करत नाही."
 ह्याचे मला खूप हसू येते कारण पालक अतिशय शिताफीने असे म्हणून आपल्या मुलाला so called हुषार म्हणून आपली सूटका करवून घेतात .
     
'हुषार आहे'असे तुम्ही म्हणता मग नेमका त्याचा interest कशात आहे हे बघणे तुमचे पहिले काम आहे.
 शाळेत नेमून दिलेले सहा विषय असतात आणि रोजच्या आयुष्यात असंख्य, यापैकी नेमका आपल्या मुलाला कोणता विषय आवडतो याचं निरीक्षण करा...........
मुळात interest ज्या विषयात आहे त्या विषयाचा वेगळा असा अभ्यास करावाच लागत नाही ,
 याचे उत्तम उदाहरण म्हणजे 3 idiots मधला रेंचो ........, त्याला मशीन मध्ये इंटरेस्ट असतो.......... रोजचे खाणे ,पिणे, उठणे ,झोपणे यासारखा सहज , आयुष्याचा एक भाग असावा असा तो मशीन चा अभ्यास करत असतो आणि तेच मार्कमध्ये reflect होऊन तो अनपेक्षितपणे कॉलेज मध्ये पहिला येत असतो.
       कधीकधी शाळेच्या शिकवायच्या बोअर पद्धती ......खूप लिहायचा वगैरे दिलेला अभ्यास....., किंवा concept clear नसल्याने मुलांना त्यात काहीच रस न वाटणे असे घडू शकते .ही शक्यता पडताळून  पहा.

कधीकधी मुलांना वही- पुस्तक - लिखाण हेच मुळी आवडत नाही.
हुशार असून सुद्धा करत नाही याला काही निरीक्षणे अपेक्षित आहेत . माझे एक निरीक्षण सांगते ....
माझ्या बहिणीला सुद्धा वह्या पुस्तक लिखाण आवडायचे नाही, पण सहावीत तिला हिंदी विषय खूपच आवडला, इतर विषयात यथातथा च मार्क असताना तिला हिंदीसारख्या भाषा विषयात पैकी च्या पैकी मार्क पडले अ ते ह टक्केवारी नुसार ठरलेल्या तुकड्यात क तुकडीतल्या हिला out of मार्क मिळाले होते . यात शिक्षकांचे श्रेय पण मोठे आहे.
असे काही उदाहरण असेल तर तुम्ही हुशार आहे पण करत नाही असे म्हणू शकता
काहिवेळा तर मुलं नुसत्या उनाडक्या करणारी आणि घरच्यांचे बोलणे कॉपी करून आगाऊपणे तर कधी पोपटपंची ने बोलणारी असतात. तरी आई वडिलांना त्याचे कौतुक असते.
हे काही हुषारपणाचे लक्षण नव्हे .
     वेळीच लक्ष न दिल्याने त्यांना आपला नेमका इंटरेस्ट कळतच नाही ...... तर कधी खूप उशीरा कळतो ...... तर काहींना कधीच कळत नाही.......

एलिझाबेथ एकादशी मध्ये एक प्रसंग आहे. त्यातल्या त्या मुलाला शाळेचे शिक्षक प्रश्न विचारतात,
" कोण व्हायचं ठरवलंय मोठेपणी ?"
 तो म्हणतो ," ठरलं नाहीये अजून".
 यावर ते ही आपापसात म्हणतात ,
" आमचंही ठरायचंय अजून ".

रोज कामावर, नोकरीला जाणाऱ्या बऱ्याच आई - बाबांचे सुद्धा हे दुःख असेल की वेळीच इंटरेस्ट न ओळखता आल्याने ,त्यावेळी जे समोर आले ते निवडून त्यातच करिअर पर्यायाने नोकरी करावी लागतेय .
किमान आज आपण आपल्या मुलांवर ही वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करूया.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Friday, May 12, 2017

# सावळा ग रंग तुझा #

#सावळा गं रंग तुझा .......#
खूप दिवस ठरवतेय ब्लॅक ब्युटीज बद्दल लिहायचे .......
पण काहीतरी खटकत होतं मनात, .....कारण माझा मुलगा गोरा व्हावा असं वाटत होतं मला जेव्हा आई व्हायची चाहूल लागली होती. ......मी गोरी आहे म्हणून नव्हे किंवा मी काळा - गोरा भेद करते मानते म्हणूनही नव्हे.
मुले मोठी होताना ... खूप छोटे प्रसंग असतात ... जसे की एखाद्या समारंभात जुनी मैत्रीण , स्नेही, ओळखीचे लोक भेटतात ज्यांनी आपल्याला.. ,मुलांना खूप वर्ष पाहिलेले नसते
गप्पात, " आगबाई हा का तुझा मुलगा?........ वाटत नाही " असे म्हणले जाते ...... उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते , सहज , सरळसाधी पण मुलांच्या मनावर परिणाम करणारी.....
जाणते झाल्यावर समजूत काढता येते , खरे सौंदर्य कशात आहे हे पटवून देता येते ....., पण अबोध वयाची मुले अशा वेळी खूप रडलेली पहिली आहेत मी .
 असे झाले तर त्याची समजूत कशी काढायची याचे उत्तर नव्हते माझ्याकडे .....आजही नाही . बरेचदा समजूत काढूनही ते खूप खोलवर , आणि बराच काळ परिणाम करणारे ठरते. बर्याच सावळ्या लोकांचे बालपण या किंवा अशा प्रकारच्या संवादाचे साक्षीदार असेल.

आई सावळी असेल आणि मुले गोरी तर फार फरक पडत नाही पण उलटे असेल तर मात्र फरक पडतो.
Intentionally कोणी बोलत नाही , पण परिणाम होतोच.

आपला सावळा रंग confidently Carry करणारे 'कृष्ण' आणि 'द्रौपदी' दोघेच असावे बहुतेक .

अतिशय यशस्वी नट ,नट्या ज्या सावळ्या होत्या , आहेत , त्यांनाही लहानपणी या color comlpex ला सामोरे जावे लागले होते.
लहान असताना मला कांजीण्या आल्या होत्या आणि नंतर काही वर्ष मी पण काळवंडले होते, त्यामुळे हा complex मलाही होता.

या बाबतीत माझ्या best friend चे वडील म्हणायचे ,
 "गोऱ्या माणसाला मनातल्या मनात काळा रंग देऊन बघायचा , तरीही तो सुंदर दिसत असेल तर तो खरा सुंदर ....."
 आपल्या मुलीला येणाऱ्या सावळ्या रंगाचा कॉम्प्लेक्स ओळखून तिच्या वयाला कळणारे सौंदर्याचे मापदंड त्यांनी तिच्यासमोर ठेवले.
तिला भेटल्यानंतर black beauties बद्दल मी खऱ्या अर्थाने विचार करायला लागले .
 या लोकांच्या स्किन ला एक नैसर्गिक तकाकी असते. गोऱ्यांपेक्षा बरेचदा सावळ्या माणसांचे फोटो खूप छान येतात .
बरेच सावळे लोक तरतरीत , स्मार्ट दिसतात . त्याउलट गोरे अनेकदा dull वाटतात.
पण या लोकांना कपड्याचा color complex पण खूप जास्त असतो , बरेचदा मातकट, brown शेड चे कपडे ते जास्त निवडतात. ..... त्यामागे बाकी रंग चांगले दिसणार नाहीत किंवा त्यात आपण जास्तच सावळे दिसू ही भावना असते😢
गोऱ्या रंगाला सगळंच चांगलं दिसत असे अजिबात नाही, बरेचदा तो विचारातील फरक असतो.
        मुळात 'सौंदर्य' ही संकल्पनाच व्यक्तीसापेक्ष आहे. रंगापेक्षाही Features, चेहऱ्यावर दिसणारा confidence आणि स्मार्टनेस ह्या गोष्टी पण खूप मॅटर करतात.

इथे अमेरिकेत हा skin tone फरक इथल्या लोकांच्या वागण्यात बदल करत नाही , हे खूप जाणवते.
पण आपल्याकडे मात्र हृदयाचा मार्ग हा चेहऱ्यावरूनच जातो.

आता थोडा बदल होतोय..... हे ही नसे थोडके!

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, May 8, 2017

घराबाहेर

Hostel किंवा room वर राहिलेल्या लोकांमध्ये खूप चांगली sustaining पॉवर असते .💪🏼 कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता ..... प्रसंगावधान..... मित्र जोडण्याचे कसब ..... स्वावलंबन ...... आणि या सगळ्यामुळे येणारी आनंदी वृत्ती.
        कामे वाटून घेणे , एकमेकांना मदत करणे , एकमेकांशी जुळवून घेणे , एकत्र मजा करणे या सगळ्यात ते ही दिवस कसे संपतात कळत नाही.
        वेगवेगळ्या ( कधीकधी विचित्र  😷)स्वभावाचे नमुने असलेली माणसे हँडल करायला
          या सगळ्याचा पुढच्या संसारी आयुष्यात खूप उपयोग होतो ........☺

#घराबाहेर#

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Sunday, May 7, 2017

चाक

चाक
आई च्या सरकारी नोकरीमुळे आमचे लहानपण वेण्णानगर (कण्हेर जवळ) मध्ये गेले. T. V. खूप कमी जणांच्या घरी....... काही मराठी पिक्चर आणि क्रिकेट मॅच सोडल्या तर तो फार कधी चालूही केला जायचा नाही. बाहेर खेळणे आणि गावभर भटकणे हे आवडते उद्योग. अनेक खेळ होते सोबतीला गोट्या ,भोवरे, विटीदांडू आणि या सोबत
पळापळी चे अनेक खेळ ....काही खेळ sesional असायचे, तर काहींची फॅशन असायची ( जशी कपड्यांची असते , काही दिवसांनी तीच फिरून पुन्हा येते.) जसे भोवरे, गोट्या .......  यात आणखी एक खेळ असायचा चाक फिरवणे. सायकल, गाड्यांची जुनी चाके सगळ्या कॉलनीतून फिरवणे. हाताने किंवा काठीने. यातही क्रमवारी असायची त्याची चाके होंडा वगैरे गाड्यांची असतील ते एक नंबर, ज्यांची सायकल ची असतील ते दोन नंबर. स्कुटर चे चाक जास्त नसायचे कारण एकतर ते जड आणि ते पळवायला खूप खाली वाकावे लागायचे पण त्याचा balance चांगला असायचा. तर असे हे चाक घरातूनच फिरवत पायऱ्यांवरून न पाडता नेता येणे, वळणावरून न थांबवता, वेग न कमी करता काठीने वळवता येणे , काठीने त्याचा वेग वाढवणे सोपे पण त्याचबरोबर कमी पण करता येणे ह्या गोष्टी ज्याला येतील तो यातला hero. मग याच्या शर्यती लागायच्या. जिंकणे, हारणे , भांडाभांडी , गटबाजी सगळे व्हायचे . पण पुन्हा दुसऱ्या दिवशी बट्टी.
             मी जेव्हा हा खेळ खेळण्याएवढी झाले तेव्हा माझ्याकडे चाक नव्हते. घरात सायकल , गाडी काहीच नाही; त्यामुळे मिळायचा प्रश्नच नव्हता. मला फार वाटायचे आपल्याकडे पण चाक असावे आपण पण फिरवावे सगळ्यांबरोबर. तेंव्हा माझ्या मावशीचे मिस्टर (वाकनिस काका) , त्यांच्याकडेच फक्त M80 होती. मी त्यांच्याकडे मागितले "मला चाक द्या , इथे फक्त माझ्याकडेच नाहीये". काही दिवसांनी ते मला चाक घेऊन आले .मुलींविषयी विशेष माया असणारे काका आणि मावशी  साताराहून वेण्णानगर ला गाडीवरून फक्त चाक देण्यासाठी आले.
           मग काय खेळताना माझा भाव पण वधारला. M80 चे चाक घेऊन मीही पळू लागले.  चाक घरातूनच फिरवत पायऱ्यांवरून न पाडता नेता येणे, वळणावरून न थांबवता, वेग न कमी करता काठीने वळवता येणे वगैरे, वगैरे.....या सगळ्यात पारंगत झाले . या खेळाने मला विशेष आनंद दिला. बाकीच्या सगळ्या खेळातले सामान मला आई - बाबांनी आणून दिले असते , पण चाक नसते देता आले त्यांना ,त्यामुळे आपल्याला हा खेळ खेळायला मिळेल असे वाटले नव्हते मला, ..... पण ते मिळाले.
               मी याच खेळाबद्दल लिहिले ते यासाठी कि यात गोट्या , भोवरे किंवा इतर खेळांसारखे काही विकत वगैरे आणावे लागत नाही. ज्या कुणी हा खेळ शोधुन काढला असेल म्हणजे (Best out of west) ते मूल खरंच सर्जनशील म्हणायला हवे.
🤗

वीरश्री वैद्य - करंदीकर

आहारबोली

माणसाच्या स्वभावाचा ढोबळ मानाने अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत .  हस्ताक्षर, सही, दिसणे , काही लकबी, वगैरे पण कधीकधी असे वाटते की पंगतीत वाढलेले ताट जेवताना, जेवण्याच्या आधी / नंतर त्याची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनहि त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.  म्हणजे बघा ..... समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे तेव्हा तो पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून उचलतो. जसे की पुरण किंवा त्याबरोबरचे गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात , ......... तळण,पापड उचलणाऱ्या माणसांचा पापड लवकर मोडतो, त्यांच्यात patience कमी असतो,.........वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे त्याप्रमाणेच साधी सरळ , atjustable असतात , ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात. .........भजी उचलणारी माणसे भज्या सारखीच कुरकुरीत, नर्मविनोदी, आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात , यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही. .........जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहिभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात .........लोणचे कुठले आहे ? आंब्याचे , लिंबाचे का मिक्स हे पाहणारे आंबटशौकीन😉 (असे माझ्या नवऱ्याचे मत आहे) असतात........ काही असेही असतात की सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात ते लोक अतिचिकित्सक असतात.
                हि वरची माणसे मुख्यप्रवाहाची यात आणखी दोन उपप्रवाह आहेत . पहिला जेवणाच्या आधी काही reactions असणारे आणि दुसरा जेवणा नंतरची reaction असणारे.
              जेवणाच्या आधी ताटे , भांडी घ्यायला सुरुवात झाली  की भांडे स्वच्छ आहे का नाही हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे का नाही हे बघून त्याची चर्चा करणार . खरे बघितले तर पाणी हा optional भाग ही असू शकतो. तुम्ही जेवल्यानंतर अगदी बिसलेरी आणून पण पिऊ शकता. किंवा एखादे दिवस atjust केले तरी काही बिघडत नाही , प्रत्येकाचेच काही पथ्य नसते पण हे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात . अशी माणसे कटकट्या स्वभावाची, आणि जुळवून घेणारी नसतात , अशांना मित्रमंडळी कमी असते किंवा नसते असतीलच तर ते हि याच catagory तील असतात.
                 समोरासमोरच्या पंगतीत ताटे वाढणे सुरु आहे , अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे... माझ्या पानात नाही... ते माझ्याही पानात हवे... आत्ताच हवे म्हणून लोक वाढपी ला (चार चार वेळेला) बोलावून वाढून घेतात ,भले त्यांना तो पदार्थ जाणार असो वा नसो. हे लोक jelous असतात . सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .
                  गोड पदार्थ वाढणारा मुख्य स्वयंपाकी ते वाढत असतानाच " हम्म मी काय म्हणालोे अहो बासुंदीच आहे ,  म्हणजे 160 रुपये ताट, स्वस्त पडले " असा डायलॉग मारणारे एकतर लग्नात मुलाकडचे असतात किंवा अत्यंत व्यवहारी , कंजूष मनोवृत्तीचे असतात ( हेच लोक कपडे खरेदीला ऐपत असतानाही कपड्या आधी price tag बघतात)
                 जेवणाच्या आधी आणि जेवण जेवताना सुद्धा जे लोक ," बाकी सगळे ठीक होते , पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते" असे म्हणून त्यांना अंघोळीला आणि बाकीच्या विधींना काय आणि कसे करावे लागले हा विषय काढतात ती अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीची असतात .समोर चांगले ताट वाढले आहे त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.
                   ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतः च आनंदी .
                  या सर्वांपालिकडे एक विशेष catagory आहे .सगळे जेवण झाल्यावर "ताक आहे का ?" म्हणून विचारणार आणि नाही  म्हणल्यावर " अरेरे ताक असते ना तर मजा अली असती " असा शेरा मारणारे .....तेच ते ....
बरोबर ओळखलंत ......एकमेवाद्वितीय.... पुणेकर ...🤗
               
ता. क. या लेखाच्या कल्पनेचे श्रेय माझ्या (वाढलेल्या ताटातील भजी पहिल्यांदा उचलणाऱ्या) नवऱ्याला जाते.☺

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

खाकी वर्दीतला माणूस

खाकी वर्दीतला माणूस

     गोष्ट साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर 2016 मधली. मी सातारा ला माहेरी शाहूपुरी मध्ये होते .कॉलनीत राहणाऱ्या देवधर काकू पायात चप्पल न घालता खूप घाईने ओढ्याच्या ( जिथे झोपडपट्टी आहे ) दिशेने जाताना दिसल्या. त्याना विचारायला गेले तेंव्हा असे कळले की नेहमी तिथून ये - जा करणाऱ्या एका झोपडपट्टी मधल्या मुलाने त्याच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढले आणि पळून गेला. कोणी घरात नसल्याचा फायदा घेऊन तो gate मधून आत आला आणि अंगणातच काकूंना त्याने पाडले , मंगळसूत्र हिसकावून तो ओढ्याच्या दिशेने पळाला. मी त्यांना म्हणाले की आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करू. 63 वर्षाच्या काकूंना काही सुचेना. त्यांना घरी नेऊन ,पाणी वगैरे देऊन त्यांना गाडीवरून शाहूपुरी पोलीस स्टेशन ला नेले.
          Police सेवेतील काही आमचे फॅमिली फ्रेंड आहेत . पण पोलीस स्टेशन मध्ये जायची आणि त्यांची कार्यपद्धती बघायची हि माझी पण पहिलीच वेळ होती.तक्रार नोंदवायला त्यांनी सुरुवात केली . त्यांच्या विचारण्यात कुठेही बेफिकीरपणा दिसला नाही ( कारण आधी अशा कित्येक cases त्यांच्याकडे आल्या असतील). या दरम्यान आणखीही काही पोलीस सहकारी आजूबाजूला आले त्यांनीही सगळी फिर्याद ऐकून घेतली . काहींनी काकूंना संशयितांचे फोटो दाखवले पण त्यातले कुणी नव्हते. या दरम्यान माझे observation चालू होते . तिथे कुणीही रिकामा व फाईल मध्ये डोके घालून बसलेला वा गप्पा मारत बसलेला नव्हता . सागळे कामात इतके व्यस्त होते की यांना जेवायला तरी फुरसत असेल का असा प्रश्न पडला मला. काकूंना प्रश्न  विचारायचा स्वरही सौम्य होता ,त्याच वेळी एखादी order द्यायचा मात्र तितकाच कठोर . तक्रार नोंदवून झाली , दरम्यान त्यांचे senior आले असावे बहुतेक . कारण त्यांच्या आणि बाकीच्यांच्या वर्दीतला खाकी रंग वेगळा होता . (माझे त्यांच्या पदाबद्दल असलेले अज्ञान 😢)त्यानीही आणखी काही प्रश्न विचारले आणि गाडी काढा म्हणून order दिली . देवधर काका तिथे आले आणि मी घरी यायला निघाले . या सगळ्यात माझ्या मुलाची अंघोळ , खाणे सगळेच राहून गेलेले.
                     मी गाडी घेऊन घरी पोहोचते आहे तोपर्यंतच मागून एक पोलीस गाडी आली त्यातून सहा सात दणकट पोलीस सिविल ड्रेस मध्ये खाली उतरले आणि सरळ समोरच्या झोपडपट्टीत शिरले . अर्ध्या तासाभरातच त्यांनी तीन मुलांना धरून आणले . त्यांच्यापैकी कोणाचेच कपडे काकूंनी वर्णन केल्यासारखे नव्हते . पण ह्याच तिघांनी लहान असल्यापासून कॉलनी मध्ये लोकांना  खूप त्रास दिला होता .नंतर कळाले की ओळख परेड झाली त्या मुलाला देवधर काकूंनी ओळखले, त्याने ते मंगळसूत्र  त्याच्या आई कडे दिले होते, ते हि काकूंनी ओळखले त्याची receipt पण काकूंकडे होती त्यामुळे काम सोपें झाले.
         चेन स्नॅचिंग चा  चोरटा अवघ्या तीन तासातच गजाआड झाला. मी आजपर्यंत पेपर मध्ये पण चेन स्नॅचिंग चोर पकडले गेले असे वाचलेही नव्हते , इथे तर प्रत्यक्षात पहिले. गाडीवरून मी आणि काकू जात असताना त्यांना आणि मलाही अजिबात वाटले नव्हते त्यांचे मंगळसूत्र कधी त्यांना परत मिळेल , पण किमान त्या मुलांना तरी दहशत बसेल असाच विचार करून आम्ही तक्रार करायला गेलो होतो. दोन दिवसांनी कळले की त्या मुलांनी असे किमान 10 गुन्हे कबुल केले.
                 एरवी पोलिसांबद्दल वाचलेले, ऐकलेले असे ......कामाला उशीर टाळाटाळ , बेफिकिरी .... प्रत्यक्षात मात्र कुठेही दिसले नाही.काही चित्रपटातूनही पोलिसांची बेफिकिरी दाखवाली जाते , माझा त्यावर कधी विश्वास नव्हताच . पण त्यादिवशी प्रत्यक्ष त्यांचे काम , त्यांच्यावर कामाचा असलेला ताणही पहिला.
              इतकी तत्परता दाखवल्याबद्दल त्या सगळ्यांचे किमान एक गुलाबाचे फुल देऊन अभिनन्दन करावे असे मनात होते पण अमेरिकाला येण्याला सात-आठ दिवसच उरल्याने धावपळीत ते जमले नाही. देवधर काका आणि बाबांचे कॉमन friend, आमच्याच कॉलनी त राहणाऱ्या सतीश कुलकर्णी काकांनी ए.सी.पी.संदीप पाटील यांना मेल करून यात मदत मिळालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची नावे लिहून त्यांचे अभिनन्दन केले तर  ए.सी.पी. चे पोस्टकार्ड ने उत्तर आले , आशय असा होता कि ' हे तर आमचे कर्तव्य आहे ,.......ज्येष्ठ नागरिकांबद्दल आम्ही विशेष काळजी घेतो.
             
         हे ऐकून मी पण खाकी वर्दीतल्या त्या माणसांना मनोमन सलाम केला🙏

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

मनःशांती

बऱ्याच दवाखान्याप्रमाणे जोशी डॉक्टरांकडे नवव्या महिन्याचे पेशंट लवकर घेतात. रोजचे नंबर चे पेशंट , इमरजंसी , सिरीयस पेशंट या सगळ्यातून डॉक्टर जमेल तितक्या लवकर या नवव्या महिन्याच्या पेशंट ना आत घेत होते. एवढे असूनही एका बाई ची चीडचीड चालूच होती. कधी आत घेणार? .....इतका वेळ लागतो का, .....नवव्या महिन्याचे पेशंट लवकर आत घेतात ते खोटंच बोलतात........ माझ्या वेळेस असेच करतात..... ओळख असलेल्याना लवकरचा नंबर देतात ...........एक ना दोन भरपूर भुणभुणी लावल्या होत्या तिने.....अविरत बडबड आणि चिडचिड.
तिची ती चिडचिड बघून खरंच मला खूप आश्चर्य वाटत होते. आईपण हे नुसते शारीरिक नाही तर मानसिक बदलही घडवत असते. बाळ जन्मल्यानंतर ते किमान 3 ते 4 वर्षाचे होईपर्यंत आईकडे हवा असणारा लागणारा संयम आणि कमालीची सहनशीलता हे नऊ महिने आणि काढाव्या लागणाऱ्या कळा शिकवत असतात. मला तरी माझ्या वेळेस असेच वाटत होते . हिला यातले खरंच काही जाणवले नसेल का गेल्या नऊ महिन्यात?, का जाणवण्यासाठी लागणारा समजूतदारपणा किंवा मानसिकता च मुळी नव्हती  तिच्याकडे ? तेच कळेना.... हळूहळू तिच्या कटकटीचा परिणाम इतर माणसांवरहि व्हायला लागला ... डॉक्टरांवर नाही पण तिच्यावर मात्र सगळे वैतागले , कारण कटकट करणारा माणूस आपल्या डोक्याशी भले कटकट करत नसेल पण त्याच्या कटकटीने वातावरण मात्र खराब नक्की होते.
              आपल्या आयुष्यातहि हे असे लोक कुठे ना कुठे भेटतात. मित्रमंडळी मध्ये असतील तर त्यांच्यापासून चार हात लांब राहता येते , नातेवाईकांचे मात्र तसे नसते. त्यांना कुठे सोडूनही देता येत नाही , किंवा आपल्यालाही पळून जाता येत नाही. वरच्या घटनेसारखेच हे लोक सगळ्या घराचे वातावरण बिघडवतात, अशांत करतात. कुणी चुकून समजवायला गेले तर 'मग... मी असाच/ अशीच आहे असे म्हणतात . हे म्हणण्या मागे त्यांचा' मी आहे तसे मला स्वीकारा ( खरेतर सहन करा) असा मतितार्थ असतो . पण हा नियम ते स्वतः ला मात्र लावत नाहीत.
          हे लोक आले की आपण आत्तापर्यंत खूप प्रयत्नाने , विचाराने केलेली आपल्या स्वभावाची चांगली , संयमी आणि सर्वसमावेशक अशी केलेली बांधणी मोडून काढतात. अशा वेळी ' लक्ष द्यायचे नाही, किंवा तशाच प्रकारचे वाचलेले काही quotes ही उपयोगी पडत नाहीत. हे लोक संयमाचा अंत बघतात. आपली बांधणी ढासळते, त्या माणसाच्या अशा स्वभावाच्या जडण घडणीला जे जबाबदार आहेत त्यांचाही प्रचंड राग येऊ लागतो, कारण चूका इतक्या पण पाठीशी घालू नयेत कि तो माणूस चुका दुरुस्त करायचेच विसरून जाईल.
                कालांतराने परिस्थिती किंवा काळ हा आपली मानसिक सुटका करवून देतो ..... आणि आपण ढासळलेली बांधणी पुन्हा नव्याने उभी करायला घेतो.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

दुसऱ्याच्या बागेतली फुले 'देवाला ' नेण्याची लोकांची मानसिकताच मला कळत नाही.
       फुले न तोडता ती झाडावर फुललेली पाहणे यातही आनंद असतो हे या लोकांना कळत नाही का ?. ते झाड लावणे , त्याला पाणी घालणे, ते किडीपासून वाचवणे हे ज्याने केलेले असते त्याला त्याचा असा निर्भेळ आनंद हे लोक मिळू देत नाहीत,  ' देवाला ' म्हणून हे सहज तोडून नेतात.
            वास्तविक तो तर फुले वगैरे मागत नाही .आपण आपल्या आनंदासाठी आणि प्रसन्नतेसाठी ती अर्पण करतो. तो तर सध्या प्रार्थनेनेपण प्रसन्न होतो .
            आमच्या घराजवळ एक एकत्र कुटुंब आहे , दोन चांगल्या breed ची कुत्री आहेत, चांदीचे दुकान आहे.
ते सुद्धा कुत्री फिरवायला नेतात आणि येता येता गणपतीला पाहिजे म्हणून लाल फुल शोधत दिसेल त्याच्या बागेतून बाहेरून सरळ काढून नेतात. मला नेहमी प्रश्न पडतो, महागडी आणि सुंदर फुले आणण्याची ऐपत देवानेच दिली असुनपण हे असा भिकारीपणा करून दुसऱ्याचा आनंद का तोडतात?..... एवढेच वाटते तर तर हे लोक फुलाचा पुडा का नाही लावत?....किंवा  फुलझाडे का नाही लावत?

# निर्बुद्ध 🙄

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

गॉसिप

स्त्री आणि गॉसिप हे पक्के समीकरणच आहे अशीच एकंदरीत आपल्या जनमानसात भावना आहे. गॉसिप न करणारी स्त्री या भूतलावर अस्तित्वात असूच शकत नाही असेच सगळ्यांना वाटते . त्यातून एखादी स्पष्ट म्हणालीच कि मला गॉसिपिंग आवडत नाही , तर तिच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही .
असे न बोलता तिने आपल्या वागण्यातून असे दाखवून दिले तरीही तू सुद्धा कशी तशीच आहेस ते prove करण्यासाठी बाकीचेच लोक आटापिटा करतात. मग तिने एखाद्यामुळे झालेला त्रास जवळच्या व्यक्तीजवळ बोलून दाखवला  , किंवा व्यक्तीचित्रणासारखे एखाद्याचे ( एकदाच ) केलेले वर्णन अशा गोष्टी सुद्धा gossiping मध्येच गणल्या जातात, पण सुज्ञ लोकांनाच व्यक्तिचित्रण आणि गॉसिप यातला फरक कळू शकतो.
       Gossip ला शुद्ध मराठीत कुचाळक्या म्हणतात.  "आपल्याला काय करायचंय ?" या वाक्याआधी आणि नंतर ज्या गावगप्पा होतात , ते गॉसिप असते.
 
 जुनेजाणते (माझी आजी ) म्हणते "उगाच कुणाबद्दल काहीबाही बोलत जाऊ नये , उद्या आपल्या पायाखाली काय येणारे हे आपल्याला माहित आहे का ? आपलं काम बरं आणि आपण बरं "
     आमच्या वेळेला सगळ्या गोष्टी मोठ्याना विचारून करायची , आणि त्यांचं सगळं ऐकायची पद्धत होती. हे वारंवार बोलून आणि कृतीतून दाखवणारे लोक जुन्याजाणत्याचे हे वरचे बोल मात्र सोईस्करपणे कानामागे टाकून गावगप्पा मारताना दिसतात.

हि gossiping ची सवय तशाच मित्रमैत्रिणींमुळे लागते किंवा अनुकरणाने . आई वा आजीला अशा गप्पा ऐकायची सवय असेल तर ती मुलांनाही लागते . सुरुवातीला अनुकरण असते नंतर सवय बनते.
मग हे अशा सवयीचे लोक  स्वतःसोडून इतर सगळ्यांबद्दल
गॉसिप करायला लागतात. अशांना कसलेही छंद नसतात.
यांना best friend असे नसतात
( इंग्लिश मध्ये एक म्हण आहे gossip is spread by wicked people :  they stir up trouble and breakup friendships)
 जे लोक daily soap वाल्या मालिका बघतात ते खूप gossip करतात असे माझे सर्वसाधारण निरीक्षण आहे.( याला अपवादही असू शकतात पण मी पाहिलेला नाही) कायम मदतीला धावून येणाऱ्या परिचितांबद्दलही जेव्हा कुचाळक्या होतात तेंव्हा मात्र यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी वाटते.

           अशाने एक व्यक्ती म्हणून तुमच्यात काहीच positive घडत नाही , उलट सगळ्यांबद्दल तुम्ही असे बोलून त्यांच्या सदिच्छा सुद्धा स्वतःकडे येण्यापासून रोखता.
           
             Gossiping मध्ये पुरुषही मागे नसतात . आपले लक्ष नाही किंवा आवडत नाही असे त्यावेळेला भासवून नंतर बायको किंवा आई - बहिणीकडून सगळी बित्तमबातमी काढुंन घेणारे पुरुष पण माझ्या पाहण्यात आहेत.

           सुदैवाने शाळेत मैत्रिणी अशा मिळाल्या कि ज्यांना वाचनाची आवड होती. वाचलेली पुस्तके, रोजचा अभ्यास , रोजचे  आलेले काही गमतीशीर अनुभव, चालू घडामोडी, इतिहास, तर कधी चित्रपट यावर आमची चर्चा व्हायची. गोष्टी (stories) सांगितल्या जायच्या . यात गॉसिप कधी झाले नाही . चर्चा किंवा गप्पा अशाच झाल्या की त्यात माणूस म्हणून घडायला काही मिळाले. त्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी असेंन. इथे अमेरिकेतही अशाच मैत्रिणी मिळाल्या. ✌  

वीरश्री वैद्य - करंदीकर

Thursday, May 4, 2017

शोध

शोध #
कधीकधी काय होत ना ,....
 एखादी वस्तु शोधायला जातो आणि आपल्याला समोर असूनही ती दिसत नाही🙃 ............खरेतर विचारांची इतकी गर्दी असते मेंदूत की जी वस्तू शोधतो आपण त्याचे रंग,रूप, आकार मनात लवकर तयारच होत नाही  ..........😦
ती वस्तू कधी, कुठे पाहिली होती किंवा त्याच्याशी संबंधित एखादी घटनाही मेंदूत लवकार मिळत नाही , वस्तू शोधायला आणि सापडायला हे होणे फार गरजेचे असते .☺
पण कधीकधी हे होत नाही आणि वस्तू समोर असूनही आपल्याला दिसत नाही.😐
                  लहानपणी , शाळेत, अगदी कॉलेज मध्ये असतानाही असे खूपदा व्हायचे माझे........मग घरचे म्हणायचे " हे काय इथेच तर आहे , समोर असूनही कसे दिसत नाही तुला ? "
मलाही नाही कळायचं , " अरेच्चा ! का बरं सापडलं नाही आपल्याला ?" 🤔
हिचे नेमके असे का होते हे पहिल्यांदा लक्षात आले ते माझ्या बहिणीच्या ..... बहिणी काही काळाने चांगल्या मैत्रिणी होतात हेच खरं !😊
                 घरी सुटी शेव आणली जायची .... एकदा असाच काही चाट खाताना आई म्हणाली, " रॅक मध्ये शेव आहे ती घेऊन ये " .
मी गेले.... मला काही सापडेना ☹..... माझी बहीण माझ्याकडेच बघत होती ...... मला नाही सापडणार अशी खात्री होती तिला! ( आणि का नाही सापडणार याच उत्तर पण)
ती म्हणाली ,
"प्लास्टिक transparent पिशवीतून दिसणारी पिवळी शेव या विचाराने शोधू नकोस" . असे म्हणल्याबरोबर माझ्या मनात हल्दीराम च्या शेवेसारखे पाकीट आले . आणि अर्थातच तसे पाकीट समोरच होते ....ते सापडले.😌
वस्तू मिळण्यासाठी Assumption पलीकडे पण रंग , रूप , आकार....... याचा विचार सुद्धा सापडला.😅
            आज मी संसारी आहे , आणि एक आईसुद्धा , त्यामुळे सजग राहावेच लागते ... पण कधीकधी असे lost व्हायला होतेच.......
            पण उद्या माझ्या मुलांचे असे झाले तर, हे का होते? आणि त्याला नक्की काय करायचं हे पण सापडले.😁😇

# तुज आहे तुजपाशी ......😷

@वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, May 2, 2017

विलायती चिंच

हिला विलायती चिंच का म्हणतात माहित नाही , काही भागात गोरखचिंच पण म्हणतात.
        माझ्या लहानपणी वेण्णानगर ला हा रानमेवा झाडावरच खायला मिळायचा . बरेचदा पांढरीच खायला मिळायची ....... लाल चिंच झाडाच्या टोकावर असायची आणि तुलनेने खाली असणाऱ्या चिंचा लाल होईपर्यंत कुणाला धीर नसायचा😁 ......मग लाल चिंच यशस्वीपणे पाडणाऱ्या मध्ये आणि खायला इच्छुकांमध्ये पेनसिली, सायकल ride अशा गोष्टींवर तह होऊन ती मिळवली  जायची.
         बाकीचे सगळे रानमेवे म्हणजे आवळे , बोरं, चिंचा( लाल , काळी दोन्ही) शहरात मिळतात पण ही चिंच अजून शहरात पाहिली नाही . फलटण च्या घोडे बाजारात मिळते असे ऐकले आहे, पण बाकी मोठ्या शहरात , मॉल मध्ये कधी पहिली नाही.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर


बालपण

हालती वस्तू बघून responce देणारी ....सहा - सात महिन्याची मुले वर्ष - सव्वा वर्षाची झाली की त्यांना आपल्या वस्तू, खेळणी कळायला लागतात.  
हे माझं आहे ( possession ) ही भावना कळायला लागते . एरवी घरात पडलेल्या खेळण्यांकडे ढुंकूनही न बघणारी मुले घरात आलेल्या त्यांच्या मित्रांनी खेळणी घेतली की मग मात्र possessive होतात.
  खाण्याच्या वेळी सुद्धा भरवताना खूप पळायला लावणारी मुले  , आई दुसऱ्या मुलाला किंवा त्यांच्याच मित्रांना भरवायला लागली की पळत आईकडे खायला येतात , आई ज्याला भरवत असते त्याच्याशी भांडतात , आणि सगळा खाऊ शहाण्यासारखा खातात.
            जी गोष्ट मुलांची तीच मुलांप्रमाणे सांभाळलेल्या प्राण्यांची.
काका , बाबा ,आजी - आजोबा पंढरपूरला असताना त्यांच्याकडे एक 'पिंटी ' नावाची कुत्री होती. त्यांच्याच समोर राहणाऱ्या डॉक्टरांकडे ' राणी' नावाची कुत्री होती.  दिवसभर या दोघी मैत्रिणी एकत्र खेळत , भटकत असायच्या .
पिंटी ला खायला ताटली ठेऊन हाक मारली तरी ती काही यायची नाही , खेळतच बसायची , आपले लक्षच नाही असे दाखवायची . खूप हाका मारूनही अजिबात यायची नाही.
मग घरातले 'राणी' ला हाक मारायचे , मग मात्र पिंटी धावत यायची. आणि येताना राणीशी भांडून यायची ( कदाचित त्यांच्या भु भु च्या भाषेत सांगत असेल ' खबरदार आलीस तर !')
             घरात आलेल्या पाहुण्याला जाताना गेटपर्यँत सोडणे ..... तो दिसेनासा होईपर्यंत त्याच्याकडे पाहत उभे राहणे...... दाढीचा साबण लावलेला ब्रश हळूच पळवणे ....... पळणाऱ्या प्राण्यांची , फुलपाखरांची मजा घेत त्यांच्यामागे पळणे असे अगदी लहान मुलांसारखेच तिचे आणखी उद्योग चालू असायचे.
         एकूणच काय enjoying childhood ☺

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

मंडई

मंडईत खूप गर्दी , गोंधळ असतो त्यावरून 'डोक्याची मंडई करणे' हा वाक्प्रचार रूढ आहे .पण
कंटाळा आल्यावर मला मंडईत फिरायला जायला खूप आवडते. ......

आठवड्याला मंडई करण्याची आवड असणारी ..........
पावशेर मध्ये तीन ऐवजी चार काकड्या बसवण्याचे (tyapical बायकांच्या मते अनोखे) कसब असणारी ............. bargining मध्ये expert................
आधी तीन वेळा मंडई फिरून मग चौथ्या वेळेला actual भाजी खरेदीला सुरुवात करणारी .....................
माझी आई दहा रुपयाला सहा लिंब घेते म्हणून मी पण तिच्या सारखेच करण्याचा प्रयत्न करत म्हणजेच भाजीवलीला सहा लिंब मागून खूप हुज्जत  घातल्यावर ती देईना म्हणून लिंबुच न आणणारी ......
या आणि अशा प्रकारच्या कुठल्याही category मध्ये मी मोडत नाही.
तरीही मला मंडई फिरायला आवडते. मग भाजी आणायची असो किंवा नसो.
             हिरव्यागार भाज्यांचे डोंगर , यात पालेभाज्या, मटार, गवार ...... या भाज्यांना येणारा स्वतःचा एक टिपिकल वास....
विशेषतः कोथिंबीर ....... कोथिंबिरीच्या पेंढ्याचे ढिगच असतात
त्याचा घमघमाट सगळ्या मंडईत फिरत असतो......त्याच्या मुळांना लागलेल्या मातीला सुद्धा कोथींबीरीचाच वास येत असतो ....   खूप फ्रेश वाटते त्याने........ जसे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन वाटते.
             शीत रंग मनाला शांत, स्थिर करतात तर............ उष्ण रंग मनाला उत्साहित करतात. ........
शीत रंग म्हणजे निळा , हिरवा च्या सर्व छटा , क्वचित grey shed पण यात येते. .........उष्ण रंग पिवळा,  लाल च्या छटा.  

निसर्गात उष्ण रंग कमी आणि शीत रंग जास्त असतो. या theory चा प्रत्यक्ष अनुभव निसर्ग पर्यटनात येतो तसा तो मंडई मध्ये पण येतो.......
आकाराने लहान फळे उष्ण तर मोठी फळे शीत रंगाची असतात .
           मंडईत या निसर्गाच्या शीत - उष्ण combination ने एकदा फ्रेश झाले की मग भाजीवाल्यांच्या वेगवेगळ्या आरोळ्या मजेशीर वाटतात. ..... आपोआपच सगळा कंटाळा जातो ...........

@ वीरश्री वैद्य - करंदीकर


उत्तरायण


मला इथली म्हातारी माणसे जाम आवडतात. म्हातारी म्हणणे बरोबर आहे की नाही हे अजून ठरवता आलेलं नाहीये मला .......कारण या शब्दाबरोबर काही गृहीतके साहजिकच मनात येतात, पण इथे मात्र चित्र वेगळे दिसते.
हे सगळे ज्येष्ठ अजून काहीं ना काही काम करतात ......
प्राणी पाळून उर्वरित आयुष्य सुखाने घालवताना दिसतात ..... आपले छंद जोपासतात....

इथे एक मॉल आहे .....मॉल मधून बाहेर पडताना ,आमच्या बिल रिसिट एक आज्जी चेक करतात , त्यांच्याकडे पाहिले की फ्रेश वाटते एकदम .
हलका make up , छान ड्रेस up , artificial nails  अशी टकाटक उभी असते बाई .....प्रत्येकाशी हसून बोलते.......
लहान मुले असतील तर त्यांनाही hi करते ........ बिलाच्या मागे मस्त smily काढून मुलाच्या हातात ठेवते, ..☺
तसं पाहिलं तर फक्त बिल तसे समान आहे का हे बघणे तिचे काम आहे .. ती हसून बोलली नाही बोलली तरी तिच्या पगारात काही फरक पडणार नाही ...... पण....
Really enjoying soul.....
         
              Park मध्ये मुलाला घेऊन खेळायला जाते तिथेही एक आज्जी आजोबा येतात . प्रेमाने मुलांकडे पाहत असतात ....घसरगुंडी वरून छान पैकी घसरून येणाऱ्या मुलांना appreciate करतात .  सगळ्यांना cute वगैरे म्हणतात ..... कुणाचे कपडे , स्वेटर, बूट , सायकल आवडेल तर त्याला छान म्हणतात.......हलक्या आवाजात गाणी गुणगुणतात .....मला कुणाकडून तरी कळले की त्यांना मुले खूप आवडतात.
          ADvertise मध्ये असे एक आजोबा पाहिले चालता येत नाही ,खुर्चीवर बसून असतात ..... लाकडी आणि त्यावर खिळे लावलेल्या tool ने लोकरीच्या टोप्या विणतात.....
 त्या विकून येतील ते पैसे अनाथआश्रमाला देतात.
            भारतात असे ज्येष्ठ आहेत ..... पण तुलनेने कमी ...... आयुष्याचा उत्तरार्ध कसा असावा याचं , बोलतं model म्हणजे इथले हे लोक.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Thursday, April 27, 2017

वळू

मागच्या आठवड्यात खूप दिवसांनी वळु चित्रपट पाहिला . वळू सारखा रूपकात्मक आणि तरीही निखळ मनोरंजन करणारा मराठी चित्रपट आजवर पाहण्यात नाही आला.
                पहिल्यांदा पाहीला तेव्हा मला माझ्या लहानपणीची आठवण आली. त्यात अस्सल ग्रामीण भाषा आणि शब्द आहेत जसे की ' ईचीभन माजावर आलंय, वशाट ,म्हसाडं ,छचोर धंदे इ. शब्दांबरोबर इंग्लिश बोलण्याचे विनोदी प्रयत्न....... सगळंच.
             "आज काय जेवायला ?"  ---- मटण,
 आणि " गुरुवारी आमच्या घरी वशाट खात नाहीत ." या दोन एकाच घरातील संवादात दुसऱ्या वाक्यात मटण किंवा तत्सम नॉनव्हेज हे शब्द का वापरले नाही? , हे जाणकारांनाच कळेल.
           
           माणसांच्या स्वभावाचे नमुने असणारी गावातील माणसे, राजकारणात उतरु पाहाणारे तरुण नेंंतृत्व, प्रेमी युगुल, स्थानिक नेत्यांचे खंदे (?)कार्यकर्ते, खोड्या काढणारी , इरसाल माणसे, जागृत देवस्थान (खरे असो वा नसो पण सांगणार जागृत) ,  सगळं गाव ज्याचे ऐकू शकते असा ज्येष्ठ आजा,
 वळू ला पकडायला आलेला फॉरेस्ट ऑफिसर , आणि त्याचा भाऊ हे दोन विरुद्ध स्वभावाचे combination....... सगळंच nostalgic.
              यात तो ज्या पद्धतीत वळू पकडतो , ती पद्धत कुठल्याही प्रॉफेशन मध्ये ideal पद्धत आहे . म्हणजे एखाद्या engineer चा प्रोजेक्ट असो, ...catering असो, ....saloon वा एखादा व्यवसाय असो , ...गाठायचे एखादे ध्येय, .
.सर करायचे शिखर , ,..... किंवा आयुष्यातला एखादा अवघड प्रश्न वा परिस्थिती .....वगैरे वगैरे .
           
              यात हा ऑफिसर प्रशिक्षित असतो......( हे जास्त महत्वाचे कारण बघून शिकणे हे कौतुकास्पद आहे पण प्रत्येक वेळेला किंवा प्रत्येक प्रोफेशन मध्ये acceptable नाही.) .....

बिबटे, लेपर्ड पकडणारा हा असा ऑफिसर officer असूनही वळू बद्दल सगळी माहिती घेतो ..... उदा. तो कधीपासून असा त्रासिक झाला .... का झाला ?..... त्यांच्या सवयी काय ?...... रोजचे रुटीन काय?...... इ. इ. त्याला पकडण्यासाठी proper प्लॅन करतो , आवश्यक ती योग्य माणसे मदतीला घेतो ....... वळू ला प्रत्यक्ष पाहतो ....आवश्यक त्या बंदुका कायम जवळ बाळगतो.. आशा सगळ्या तयारीनिशी , कुणाचे काहीही नुकसान होऊ न देता पकडतो....... यात तो वळूला इजा होऊ नये म्हणून गळ्याऐवजी शिंगात दावे टाका असे सांगतो त्यावेळेला proper training आणि अनुभव  ( कुठलाही proffesion मध्ये ) किती महत्वाचा आहे हे कळतं.
         
            हेच way of working यशस्वी लोकांचे असते , ते वर सांगितलेल्या सगळ्या proffesion मध्ये लागू पडते .
म्हणजे बघा ...
* ध्येय ठरवणे ( set a goal) .....
* त्याचा आवाका लक्षात घेणे......
* त्याची साधक बाधक माहिती  घेणे ......
* त्यानुसार स्वतः मध्ये कौशल्ये विकसित करणे          
   (develop skills n ability),
*  प्रशिक्षित होणे ( training) ,
*  मदतीला माणसे निवडणे ,(skilled resorses) ,              *  साधनसामुग्री जवळ बाळगणे ( wel - equipped) ,
*  काम प्रत्यक्ष पाहणे ( field visit) ,
*   loop holes काढून टाकून सगळी तयारी करणे    
    ( proper planning)
*  या सगळ्यांच्या मदतीने पद्धतशीरपणे काम पार पाडणे
    (goal achieved ).
              यातली कुठलीही पायरी skip केलीत तर काम नीट होणार नाही. जसे चित्रपटात तो वळू ला जेव्हा प्रत्यक्ष बघतो ... त्याचे साथीदार हाकेच्या अंतरावर असतात पण तो त्यांना बोलावत नाही , निरीक्षण करून वळूचा आकार ..... आवाका याचा अंदाज घेतो .... पकडायची घाई करत नाही...... योग्य संधी साधून मगच काम पार पाडतो.
             हे सगळे corporate skills एका ग्रामीण पार्श्वभूमीवर आणि अतिशय विनोदी ढंगात दाखवले आहेत .
अशी मंडळी द. मा. मिरासदार यांच्या पुस्तकात कुठे ना  कुठे भेटतात. चित्रपटाचे music आणि title song ना असणारी व्यंगचित्रे ' Malgudi Days ' ची आठवण करून देतात.
             
            या सगळ्याव्यतिरिक्त काही स्वछ आणि निर्मळ माणसे जशी की जीवन ची माय, किंवा येडी जनी , मन जिंकून जातात.
            सगळेच nostalgic !!!

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, April 25, 2017

एखादे गाणे instrumental ऐकले की तेच पुनः lyrics पण ऐकायचा मोह होतो .
       कधीकधी काम करताना नुसते instumental ,
Background ला लावून ठेवावे वाटते.
        इथे thanks to internet TV मनात आले की लगेच बघता येते. 😊 आणि ऐकता पण येते .

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, April 24, 2017

पुरुषाचा जन्म

पुरुषाचा जन्म

परवा एक सिनेमा बघताना एक संवाद होता त्यात बहीण भावाला म्हणते "तू बदललास"(आशय : बायकोमुळे). ज्यांच्या लग्नाला चार ते सहा महिने झालेत अशा बऱ्याच मुलांना असे त्यांच्या घरच्यांकडून कधीतरी ऐकायला मिळाले असेल.
         
              'काल काल पर्यंत कुठला शर्ट घालू?'......... ते ....'अमुक अमुक खायला कर'....... असे सांगणारा मुलगा किंवा भाऊ तेच त्याच्या बायकोला सांगू लागतो .........त्यामागे त्याचा उद्देश तिला जास्त महत्व देण्याचा नसून तिला घरात कंफर्टेबल करण्याचा असतो ,
पण त्याच्या जवळची माणसेच हे समजून न घेता त्याच्यावर सरळ आरोप करतात.
         
 त्याच्याशी लग्न करून येणारी मुलगी हि त्याच्याच भरवशावर येत असते , आणि जन्मभर त्याच्या बरोबरची सहचारिणी म्हणून राहणार असते ........ सासरी फक्त नवराच तिचा हक्काचा माणूस असतो आणि हे त्या मुलालाही चांगले माहित असते म्हणूनच त्याची प्रायोरिटी बायको होते. ......पण याचा अर्थ असा मुळीच नसतो कि तो बाकीच्यांना विसरून गेला.
             वास्तविक पाहता लग्न झाल्यानंतर मुलाच्या प्रायोरिटीज बदलणार किंवा विभागल्या जाणार यासाठी त्यांच्या घरच्यानी तयार असायला हवे........विशेषतः लहान भाऊ, बहीण यांनी तयार असायला हवे कारण आत्तापर्यंत त्यांच्यावर असलेला दादा चा फोकस आता विभागाला जाणार असतो . कधी ना कधी या लहानांचे सुद्धा  लग्न होणार असते  त्यांना याच प्रकारात atjust करावे लागणार असते , पण असे होताना फार कमी दिसते ......अशा वेळेला आई - वडिलानी त्यांना समजवायला हवे......त्यांना नवीन माणूस घरात येणार आहे यासाठी मानसिक दृष्टीने तयार करायला हवे.......
पण असेही फारच कमी होते.....त्यांना समजावणे दूरच
कित्येकदा त्यांच्या जोडीने
( मुलांमध्ये भेदभाव न करणारी) आईसुद्धा ज्यावेळी तू बदललास असे मुलाला म्हणत असेल त्यावेळी त्याच्या मनाची अवस्था काय असेल  त्यालाच  ठाऊक.
           
@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Saturday, April 22, 2017

पेन आणि पालकत्व

हिरो पेनची शाळेत असताना खूप क्रेझ होती ..... जवळजवळ प्रत्येकाकडे असायचाच तो, काहीं जवळ तर दोनसुद्धा असायचे. इतर बॉलपेनच्या तुलनेत तो बऱ्यापैकी महाग होता....... मला वाटते आजही महाग आहे....
             शाळेत असताना माझ्याजवळ पण हिरो पेन होता  एकदा तो हरवला.....खूप शोधला पण सापडलाच नाही.....तोंड पाडून मी घरी आले.
काहीही झाले तरी घरी ते निसंकोचपणे आणि मोकळे पणाने सांगता येईल असे पोषक वातावरण घरात होतेच .... त्यामुळे घरचे काय म्हणतील? अशी भीती वा दडपण नव्हते , पण आपण आपली अत्यंत आवडती आणि महाग वस्तु हरवली याची गिल्ट मनात असायची.

पेन हरवल्यावर साधे 5 व 10 रु चे बॉलपेन असायचे जवळ मग त्यानेच लिहायचे असे ठरवून टाकले मी.....पण दोन-तीन दिवसांनी आईने पुन्हा हिरो चे पेन आणून दिले.......( देताना सज्जड दम.... पुन्हा हरवलास तर याद राख अशी समज वगैरे काहीही न देता)
एखाद्या कंटाळवाण्या दिवशी कापसाची म्हातारी उडताना बघितल्यावर जसा आनंद होतो ना तसा झाला मला.

शालेय आयुष्यात दोन तीन वेळा पेन हरवल्याच्या घटना घडल्या ( हे casually नाही पण प्रांजळपणे कबुली आहे ) पण आई पुन्हा आणून  देत गेली. तिच्या या देण्यामुळे मी वस्तू वापराबाबत निष्काळजी झाले किंवा हरवण्याबाबत casual झाले ....असे काही झाले नाही .

नंतर खूप वर्षांनी आठवले म्हणून मी तिला विचारले
," मी दोन तीनदा हरवून सुद्धा तू मला न रागावता परत असा महाग पेन परत कसा काय द्यायचीस? , मी लाडाने बिघडेन असे नाही का वाटले तुला ?  "
ती म्हणाली , मुळात मुले कुठलीही गोष्ट मुद्दाम हरवत किंवा कुठे फेकून देत नाहीत, तू वस्तू वापरण्याबाबत निष्काळजी कधीच नव्हतीस ,......... तुझ्या पेनाची निप तूटलिये , टोपण हरवलेंय असं कधी व्हायचे नाही .........जुनी पुस्तके पण तू निघालेली पाने चिकटवून किंवा शिवून, त्याला कव्हर घालून  व्यवस्थित वापरायचीस. म्हणजेच दिलेल्या गोष्टीची किंमत तुला होती ......शाळेतुन निघण्याच्या गडबडीत , कधी नकळत बेंच खाली पडून हरवतात गोष्टी  ........ ती हरवली याची गिल्ट पण तुझ्या मनात असायची.  आणि सर्वात महत्वाचे
काही गोष्टींची मजा त्या त्या वयोगटातच असते ."

इथे आईने माझा एक स्वतंत्र व्यक्ती समजून केलेले निरीक्षण आणि त्यावरचा निर्णय खूप आवडला .

             हिरो पेनाची क्रेझ आज पण आहे , आज मी दहा पेन विकत घेऊ शकते ,पण लिहिणार काय ? शाळेत जसा त्याचा वापर होता तितका नाही करू शकणार. हि जशी पेनाची गोष्ट तशीच कंपास बॉक्स ची ते बाबांनी आणून दिले , खूप वेगवेगळे तसे शाळेत फार कुणाचे इतके नसायचे. '
आम्ही दहावीपर्यत एकाच तो टिपिकल पत्र्याचा कंपासबॉक्स वापरला' हे रद्दड वाक्य माझ्या वाट्याला आले नाही ,
आता खूप महाग कंपासबॉक्स पण मी घेऊ शकते....
पण आता मी त्याचे काय करणार? त्याची मजा शालेंय आयुष्यातच होती.

               हा पेनाचा किस्सा मी माझ्या नवऱ्याला सांगितला तर त्यान त्याचीे आठवण मजेशीर पद्धतीत सांगितली '
माझ्या घरी तर ओरडा बसणार हे ठरलेले असायचे , सहजासहजी दुसरा पेन मिळायचा नाही .... आता कशाने लिहिणार ? असा विचार करत निप, टोपण आणि बाकी पेनाचे भाग आयात करून मी नवीन पेन बनवायचो. तुझी आई तुला पेन द्यायची त्यामुळे तू नवीन पेन तयार करण्याच्या सर्जनशीलतेला मुकलीस 😂😂😂

         विनोदाचा भाग सोडा , आज मी पण एक पालक झाले मला इतर पालकांना प्रश्न विचारावा वाटतो
माझ्या आईच्या जागी तुम्ही असतात तर तुम्ही काय केले असते ?
मला काही पालकांकडून मिळालेली उत्तरे
1. पेन हरवल्याबद्दल एखादा दणका दिला असतात. आणि मग               महिन्याभराने तसले पेन दिले असते
2.ओरडलो नसतो पण  पुन्हा लवकर ते पेन दिले नसते .
3. पुन्हा पेन दिले असते पण सज्जड दम दिला असता कि आता हरवले तर परत देणार नाही
4. आम्ही इतक्या महागातले पेन देऊन नसते लाड करत नाही
याने मुले बिघडतात.
5. मुलांना थोडेतरी ओरडले च असतो त्याशिवाय त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव कशी होणार ?
6. एकदा काय दहादा दिला असता, आम्हाला नाही मिळाले ते त्यांना आम्ही देणार
तुम्ही काय कराल ?